मुंबई |
काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली.भाजपाचे उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून आल्या आहेत.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रज्ञा सातव यांना आज प्रमाणपत्र दिले. यावेळी बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. या सर्वांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांना विधानपरिषदेवर बिनविरोध पाठवत महाराष्ट्रातील राजकीय परंपरा जपली गेली आहे. सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळत असताना भाजपने सातव यांच्यासाठी उमेदवारी मागे घेऊन जी राजकीय परिपक्वता दाखवली आहे त्याचे सत्ताधारी पक्षांकडून कौतुक होत आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. तसंच यावेळी ही निवड बिनविरोधी व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केलेल्या विनंतीनंतर भाजपाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.