Last Updated on 31 Jan 2026 10:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्यांवर कारवाई करणार, दोषींना माफी नाही
नवी दिल्ली ।
शेतकऱ्यांचे परिश्रम, पीक आणि त्यांच्या भविष्याचे नुकसान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. बनावट बियाणे, बनावट खते आणि बनावट कीटकनाशकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या घटकांविरोधात कठोर आणि दंडात्मक कारवाईच्या दिशेने केंद्र सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना बळकट कायदेशीर कवच देण्यासाठी नवीन कृषी कायदे लवकरच संसदेत सादर केले जातील. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या छत्तीसगडच्या एक दिवसीय दौऱ्यात हा स्पष्ट आणि ठाम धोरणात्मक संदेश दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि त्यांचा सर्वांगीण विकास हे भारत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. काही समाजविघातक घटक बनावट शेती संबंधित साहित्याची विक्री करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करत आहेत, हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर शेतकऱ्यांचा थेट विश्वासघात आहे. अशा घटकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

नैसर्गिक शेती आणि जलसंवर्धन
नैसर्गिक शेती, सूक्ष्म सिंचन आणि जलसंधारणावर आधारित शेती, हे शेतीचे भविष्य असल्याचे सांगून, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतीबरोबरच केंद्रीय मंत्र्यांनी ग्रामीण विकास योजनांवर विशेष भर दिला.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा आणि शेती फायदेशीर करण्याचा संकल्प
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या भाषणात, छत्तीसगड आणि देशभरातील शेतीला फायदेशीर बनवण्याचा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्यपूर्ण वाढ सुनिश्चित करण्याचा केंद्रसरकारचा संकल्प असल्याचा पुनरुच्चार केला. आधुनिक तंत्रज्ञान, कठोर धोरणे, प्रभावी कायदे आणि शेतकऱ्यांचे कठोर परिश्रम यामुळे कृषी क्षेत्रात नवीन क्रांती घडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












































































