Last Updated on 04 Nov 2021 1:07 AM by Sanjay Patil/Adhorekhit
औरंगाबाद |
औरंगाबाद जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावार लसीकरण करावे, असे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडाविया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार इतर राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
लसीकरणाविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन कवचकुंडल अभियान’ राबवून लसीकरण वाढविले आहे. ‘मन में है विश्वास’ हा कोरोना विरूद्धच्या लढाईत मनोबल वाढविणारा उपक्रम आम्ही राबविला. या कार्यक्रमात विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते तसेच आर्मीचा देखील सहभाग होता. हा कार्यक्रम यापुढेही सुरू राहणार असून त्याची व्याप्ती अधिक वाढविण्यात येईल. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या 25 गावांना विशेष निधी देण्यात येणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागासाठी ‘मेरा वार्ड सौ प्रतिशत टीकाकरण वार्ड’, ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’ असे वेगवेगळे प्रयोग करून जिल्ह्यात लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले.










































































