सांगली । ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणे,ही काळाची गरज आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एका बाजूला ३० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादनात वाढ होऊन दुसऱ्या बाजूला पाणी,खतात बचत होते, जमिनीची सुपिकता टिकून राहते. आपला साखर कारखाना आपणास पूर्ण सहकार्य करेल. आपण प्रगतशील शेतकरी म्हणून ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू करावा,असे आवाहन माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना केले. आ.जयंत पाटील यांची व्हीएस आयच्या कृती गटाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी जि.प. उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू साखर कारखाना, ऍग्री कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (केव्हीके) बारामती, व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पुणे यांच्या वतीने आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील,व्हीएसआयचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.अशोक कडलग,केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.विवेक भोईटे, ओंकार ढोबळे,ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, कार्यकारी संचालक आर. डी.माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले, बारामती येथे एआय तंत्रज्ञानाचा ऊस शेतीत वापर करून एकरी उत्पादन वाढते, हे सिद्ध झाले आहे. गेल्या पाच वर्षापासून ऑस्कफर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकार्याने काम सूर आहे. येत्या २५ तारखेपर्यंत व्हीएसआय व केव्हीकेचा करार केला जाईल. त्यानंतर आपला कारखाना करार करेल. आपल्या कारखान्याच्या ऊस विकास विभागातील अधिकारी-कर्मचारी आपणास मार्गदर्शन करतील आणि कारखाना आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील. आपण या उपक्रमात सहभागी व्हावे. पुढच्या टप्प्यात १०-१५ हजार शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊ.
डॉ.अशोक कडलग म्हणाले, सध्या शेती करताना शेतकऱ्यांच्यासमोर अनेक आव्हाने, अडचणी उभा आहेत. ही आव्हाने,अडचणी कमी करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आपल्या परिसरात क्षारपड जमिनीचा मोठा प्रश्न आहे. क्षारपड जमिनीत ही एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस शेतीत उत्पादन वाढ करू शकतो.
डॉ.विवेक भोईटे म्हणाले, एआय तंत्रज्ञानात सॅटेलाईट, वेदर स्टेशन व सेन्सॉर यंत्रणेतून शेतकऱ्यांना मराठीतून अचूक माहिती दिली जाते. त्यातून पाणी, खत आणि किडींचे अचूक व्यवस्थापन केल्याने उत्पादनात निश्चितपणे वाढ होत आहे. आ.जयंत पाटील हे व्हीएसआयच्या एआय तंत्रज्ञान वापर कृती समितीचे अध्यक्ष आहेत. आपण सर्वांनी या तंत्रज्ञानाचा वापर निश्चितपणे सुरू करायला हवा. सध्या तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश राज्यातील शेतकरी आमच्या बरोबर या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यावेळी त्यांनी एआय तंत्रज्ञानाची अगदी सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
प्रारंभी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या पुढाकाराने कारखाना राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण आणि शेतकरी हिताच्या विविध योजनांची माहिती दिली. ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले.
विनायक पाटील, विश्वासराव पाटील, शशिकांत पाटील, शिवाजीराव साळुंखे, संग्राम फडतरे, विठ्ठल पाटील, प्रदीपकुमार पाटील, श्रेणीक कबाडे, रघुनाथ जाधव, बबनराव थोटे, शैलेश पाटील, डॉ.योजना शिंदे-पाटील, हणमंत माळी, रमेश हाके, राजकुमार कांबळे, माणिक पाटील, अभिजीत पाटील, माणिक शेळके, शहाजी माळी, विनायक पाटील, निलेश पवार, अशोक देवकर, हेमंत पाटील, मोहन कदम, विराज पवार,सुहास पवार,अमर पाटील, वैभव हाके,अमोल लकेसर, कुबेर खुळे, देशभूषण सावळवाडे यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी, तसेच शेती विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.