भारतातील समाजव्यवस्थेचा एक विचित्र विरोधाभास म्हणजे शेतकरी हा अन्नदाता म्हणून हवा असतो, पण जावई म्हणून नको असतो! एकीकडे शेतीवर अवलंबून असलेली संपूर्ण अर्थव्यवस्था आहे, तर दुसरीकडे शेतकरी मुलगा असल्यास लग्नासाठी नकार दिला जातो. याला जबाबदार कोण? समाज? बदललेली जीवनशैली? की असुरक्षित वाटणारा शेती व्यवसाय?
आजकाल अनेक ठिकाणी असे दिसते की, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची, ऑरगॅनिक अन्न खाण्याची हौस असते; शेतीवर चर्चा झडतात, ट्रेकिंगसाठी ग्रामीण भागात जायचं आकर्षण असतं, पण जेव्हा विवाहाचा विषय निघतो, तेव्हा मात्र ‘शेतकरी नवरा नको’ अशी मानसिकता आडवी येते.
कधीकाळी शेतकरी म्हणजे केवळ बैल, नांगर आणि मळकट कपड्यात वावरणारा असा एक साचेबद्ध समज होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. शेतकऱ्यांची मुलं उच्च शिक्षण घेत आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत, शेतीला आधुनिकतेची जोड देत नवीन संधी शोधत आहेत. तरीही, विवाहाचा विषय आला की, शेतकरी पोरगा म्हणजे ‘अडाणी’, ‘अस्थिर उत्पन्नाचा’ किंवा ‘कष्टमय जीवन जगणारा’ असे टोकाचे गृहीतक तयार केले जाते.
कित्येक गावांमध्ये आजही असे चित्र दिसते की, सुशिक्षित मुलींचे कुटुंब शेतकरी मुलाशी लग्न करण्यास उत्सुक नाही. कारण, शेती म्हणजे अनिश्चितता, कष्टाचं जीवन, हवामानावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आणि अपुऱ्या सोयी-सुविधा. शहरीकरणाने जीवनशैली बदलली आहे, त्यामुळे स्थैर्य असलेल्या नोकरीलाच जास्त प्राधान्य दिले जाते.
हा विरोधाभास आणखी गंभीर वाटतो जेव्हा हेच लोक “शेतीत पैसे नाहीत” असे म्हणतात, पण बाजारात स्वस्त दराने चांगले अन्न मिळावे, अशी अपेक्षा ठेवतात. शेतकऱ्यांना पिकाला योग्य दर मिळत नाही, सरकारकडून आधार कमी, हवामानाचा लहरीपणा – यामुळे शेती एक अवघड व्यवसाय झाला आहे. तरीही, जर अन्नदाताच उरला नाही, तर समाज चालेल कसा?
खरं संकट तरी काय आहे?
-
अस्थिर उत्पन्नाचा समज – शेती ही उत्पन्नाच्या बाबतीत अस्थिर असते, यात काही शंका नाही. पण आज शेतीला जोडधंदे, प्रक्रिया उद्योग आणि स्टार्टअप्सची मोठी संधी आहे. जर एखादा तरुण आधुनिक शेतीत नवकल्पना आणत असेल, तर तो कोणत्याही नोकरदारापेक्षा अधिक स्थिर आणि स्वावलंबी आहे.
-
ग्रामीण-शहरी मानसिकता – अनेक मुलींना शहरात नोकरी करायची असते, त्यामुळे ‘गावात राहणं’ ही त्यांच्यासाठी अवघड बाब वाटते. गावाकडची जीवनशैली ही मागासलेली आहे, असा गैरसमज अजूनही शहरी लोकांच्या मनात आहे.
-
लग्न जमत नाही, म्हणून शेती सोडणारे तरुण – काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की, मुलगा शेतकरी असेल तर त्याचं लग्न जमत नाही, त्यामुळे अनेकजण शेती सोडून शहराकडे वळतात. यामुळे केवळ शेतीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो.
समस्या सुटायची कशी?
- शेतीला प्रतिष्ठा मिळायला हवी. शेतकरी म्हणजे मागास नाही, तर तो देशाचा अन्नदाता आहे. आधुनिक शेती करणाऱ्या तरुणांचा सन्मान होणं गरजेचं आहे.
- शेतीला पर्यायी उद्योगांची जोड द्यायला हवी. केवळ पारंपरिक शेती करून न थांबता, शेती प्रक्रिया उद्योग, दुग्धव्यवसाय, तंत्रज्ञानाधारित शेती याकडे लक्ष द्यावं.
शेतकरी म्हणजे केवळ जमिनीवर काम करणारा नाही, तर तो एक व्यवस्थापक, संशोधक आणि उद्योजकही असतो. त्याने मेहनतीने पिकवलेले धान्यच आपले अस्तित्व टिकवते. मग लग्नासाठी मात्र त्याच्याकडे दुय्यम नजरेने का बघितले जाते?
समाजाने हे समजून घ्यायला हवं की, शेतकरी असणं हा दोष नाही, तर तो कष्टाचा सन्मान आहे. जर ही मानसिकता बदलली नाही, तर भविष्यात शहरातलीच नव्हे, तर गावाकडची मुलं शेतीपासून पूर्णपणे दूर जातील. आणि मग ज्यांना ‘शेती हवी, पण शेतकरी नवरा नको’ असं वाटतं, त्यांना उद्या मुळात शेतीतूनच मिळणाऱ्या अन्नधान्यासाठी संघर्ष करावा लागेल.
शेतकरी टिकला, तरच शेती टिकणार आहे!
आता निर्णय थर्ड अंपायर अर्थात समाजाच्या हाती आहे – विचार बदलेल, की विरोधाभास तसाच राहील?
– थर्ड अंपायर
Recent Posts
बातमी शेअर करा : मुंबई । नैसर्गिक वाळूच्या अती उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी व टिकाऊ साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यात कृ... Read more