पुणे : पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या देशभरात फक्त महाराष्ट्रात आहे. गरीबांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र व राज्याची डबल इंजिन सरकार कार्यरत आहे. २०२९ पर्यंत देशभरात ५ कोटी घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वितरित करण्यात येतील. २०४७ पर्यंत देश विकसित करण्याचे उदिष्ट्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले असून, घरासोबतच शौचालय, सोलर वीज आणि गॅस सिलेंडर ही आगामी काळात मिळेल, असे आश्वासन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवितात. एका क्लिक वर दहा लाख लोकांच्या खात्यात, पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता जमा झाला आहे. हे आता राहूल गांधी यांनी लक्षात घेतले पाहिजे. महायुतीच्या सरकारला जनतेचा आशीर्वाद लाभला आहे. महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो. केंद्र आणि राज्यात डबल इंजिनचे सरकारचे विकास करू शकते, हे आता जनतेला समजून चुकले आहे. महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षांत अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत. त्यामुळे लोकांना देखील आता समजून चूकले आहे की खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणती. असेही केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यावेळी आवर्जून म्हणाले.
बालेवाडी येथे शनिवारी (ता.२३) ,प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी पत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्त्याचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी साडेचार वाजता कऱण्यात आले होते. त्यावेळी अमित शाह बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रिय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना घरकूल मंजूरी पत्र देण्यात आली. तसेच ऑनलाइन पद्धतीने बटण दाबून १० लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्त्याचे वितरण करण्यात आले. तसेच महाआवास सन्मान पुस्तिकेचे आणि अभियान पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, २० लाख लोकांना स्वतःचे घर मिळत आहे. घरसोबत शौचालय, सोलर पॅनेल आणि गॅस सिलेंडरही आगामी काळात मिळेल. कार्यक्रम संपण्याच्या अगोदरच १० लाख लोकांना घराचा पहिला हप्ता एका क्षणात खात्यामध्ये ट्रान्सफर पण कऱण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला की, एकाच वेळी २० लाख लोकांना घरकूल मंजूरी पत्र द्यायची आहेत. तेंव्हा मी आश्चर्य चकित झालो होतो. प्रत्येक नागरिकाचे स्वतःच्या घरात राहण्याचे स्वप्न असते. मी उत्तरप्रदेश च्या देवडिया गावात या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळी तेथील एका माईला पहिल्यांना घर मिळाले, तेंव्हा ती म्हणाली माझी पुढची पिढी या घरात राहील,त्यामुळे मी धन्य झाले आहे. गरीबांचा सन्मान आणि स्वाभिमान राहण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशाच्या प्रत्येक व्यक्तीचे घर, शौचालय, सोलर वीज, पाच लाख स्वास्थ्य सुविधा, पाच किलो अनाज देणे हीच विकसित भारताची व्याख्या आहे. तिसर्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी, प्रधानमंत्री आवास योजना चरण २ ची सुरवात केली. या योजनेअंतर्गत सर्वाधिक घरे महाराष्ट्र राज्याला मिळाली आहेत. २०२९ पर्यंत ५ कोटी घरांचे वितऱण कऱण्याचे उदिष्ट्य केंद्र सरकारने बाळगले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ३ कोटी ८० लाख घरांचे वितरण झाले आहे. महाराष्ट्रातील २० लाख लोकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. नवीन घरात आपला परिवार सुखी राहो. आपली प्रगती होवो आणि विकसित भारतासाठी आपले योगदान लाभो. अशा शुभेच्छाही अमित शाह यांनी दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, पहिल्या टप्प्यात १३ लाख ५७ हजार घरे जाहीर झाली. त्यापैकी १२ लाख ६५ हजार घरे बांधून पूर्ण झाली. दुसर्या टप्प्यात २० लाख घरे देण्यात येणार असून, त्यांना मंजूरी पत्रे देण्यात आली आहेत. पुढच्या पंधरा दिवसात ऊर्वरित १० लाख नागरिकांच्या बँक खात्यातही या योजनेचा पहिला हप्ता वितरीत करण्यात येईल. या योजनेअंतर्गत, १ लाख २० हजार रुपये, नरेगा मार्फत २८ हजार रुपये, शौचालयासाठी १२ हजार रुपये असे एकूण १ लाख ६० हजार रुपये सरकार देते. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आणखीन ५० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना जवळपास २ लाख रुपये मिळतील. घरांसोबत आता सोलर वीज देण्यात येईल. तसेच विविध राज्य सरकारी योजनां द्वारे आणखीन १७ लाख घरे बांधून देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण ५१ लाख कुटूंबियांना घरे देण्यात येतील. त्यासाठी ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. पुरुषांप्रमाणे महिलांचेही नाव घरावर असेल. घर बांधण्यासाठी पाच ब्रास रेती देखील मोफत देण्यात येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाला आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करण्यासाठी प्रत्येकाचे स्वतःचे घर असणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यामुळे आता अनेकांचे घराचे स्वप्न आता पुर्ण होणार आहे. जिसका कोई नहीं उसके पिछे मोदी और शाह ख़डे रहते हैं. लवकरच राज्यामध्ये हाऊसिंग पॉलिसी देखील लागू करणार आहोत. या पॉलिसी व्दारे ज्येष्ठ नागरिकांना देखील या योजनेचा लाभ मिळेल. गेल्या अडीच वर्षांत महायुतीच्या सरकारने अनेक प्रकल्प मार्गी लावले. भावी काळातही लाडकी बहिण योजना सुरूच राहील याची मी सर्व बहिणींना खात्री देतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे आघाडीचे राज्य आहे. अनेक क्षेत्रात महाराष्ट्राने प्रगती केली आहे. अनेक क्षेत्रात विकासाची कामेही सुरू आहेत. केंद्रिय अर्थसंकल्पातही महाराष्ट्राला मोठा वाटा देण्यात आला आहे. मी २५ वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र पहिल्यांच एकाच वेळी २० लाख लाभार्थ्यांना मंंजूरी पत्रे देण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती आणि ३५१ पंचायत समितीमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होत आहे.प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहेत.
Courtesy: Prasar Bharati