भारतातील समाजव्यवस्थेचा एक विचित्र विरोधाभास म्हणजे शेतकरी हा अन्नदाता असतो, पण जावई म्हणून नको असतो! एकीकडे शेतीवर अवलंबून असलेली संपूर्ण अर्थव्यवस्था आहे, तर दुसरीकडे शेतकरी मुलगा असल्यास लग्नासाठी नकार दिला जातो. याला जबाबदार कोण? समाज? बदललेली जीवनशैली? की असुरक्षित वाटणारा शेती व्यवसाय?
कित्येक गावांमध्ये आजही असे चित्र दिसते की, सुशिक्षित मुलींचे कुटुंब शेतकरी मुलाशी लग्न करण्यास उत्सुक नाही. कारण, शेती म्हणजे अनिश्चितता, कष्टाचं जीवन, हवामानावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आणि अपुऱ्या सोयी-सुविधा. शहरीकरणाने जीवनशैली बदलली आहे, त्यामुळे स्थैर्य असलेल्या नोकरीलाच जास्त प्राधान्य दिले जाते.
हा विरोधाभास आणखी गंभीर वाटतो जेव्हा हेच लोक “शेतीत पैसे नाहीत” असे म्हणतात, पण बाजारात स्वस्त दराने चांगले अन्न मिळावे, अशी अपेक्षा ठेवतात. शेतकऱ्यांना पिकाला योग्य दर मिळत नाही, सरकारकडून आधार कमी, हवामानाचा लहरीपणा – यामुळे शेती एक अवघड व्यवसाय झाला आहे. तरीही, जर अन्नदाताच उरला नाही, तर समाज चालेल कसा?
आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, कृषी व्यवसायातील संधी यामुळे शेतीला नवसंजीवनी मिळते आहे. अनेक तरुण शेतीत प्रयोगशील होत आहेत, नवे स्टार्टअप्स शेतीला जोडले जात आहेत. पण तरीही, “शेती करणारा नवरा नको” ही मानसिकता बदलायला का तयार नाही?
समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा
शेतकरी म्हणजे केवळ जमिनीवर काम करणारा नाही, तर तो एक व्यवस्थापक, संशोधक आणि उद्योजकही असतो. त्याने मेहनतीने पिकवलेले धान्यच आपले अस्तित्व टिकवते. मग लग्नासाठी मात्र त्याच्याकडे दुय्यम नजरेने का बघितले जाते?
जर शेतकऱ्यांना सन्मानाने जगायचे असेल, तर समाजाने हा दृष्टीकोन बदलावा लागेल. शेतीमध्ये स्थैर्य आणण्यासाठी तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, सरकारी आधार आणि बाजारपेठेतील सुधारणा आवश्यक आहेत. पण त्यासोबतच, “शेती करणारा नवरा नको” ही मानसिकता मोडीत काढण्याची जबाबदारी समाजाने उचलायला हवी.
शेतकरी टिकला, तरच आपले अन्न टिकेल!
आता निर्णय थर्ड अंपायर अर्थात समाजाच्या हाती आहे – विचार बदलेल, की विरोधाभास तसाच राहील?
– थर्ड अंपायर