Last Updated on 08 Nov 2024 2:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजकारण हा विरोधकांचा व्यवसाय आहे.स्वत: च्या व्यवसाय दृष्टीकोणातुन शेतकर्यांची अर्थिक पिळवणुक होत आहे. मी ९० टक्के समाजकारण व १० टक्केच राजकारण करतो, कारण मला हृदय आहे. विरोधकांना हृदय असत तर त्यांनी दीपावलीला त्यांच्या कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान १०० रुपयेप्रमाणे दिला असता तर दिवाळी शेतकर्यांनी आनंदाने साजरी केली असती शेतकरी आर्थिक सक्षम झाला तर त्यांचे राजकारणाचे दुकान बंद होईल. या भीतीपोटी ते आजपर्यंत पुरेपूर काळजी घेत आले आहेत, असा आरोप इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केला.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील बोरगाव, ताकारी येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते. यावेळी इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील, मधुकर हुबाले प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, बोरगाव व ताकारी ही गावे एका वेगळ्या विचारांची आहेत. ही गावे मतपिटीतून उत्तर देणारी गावे आहेत. सर्वात जास्त ऊस उत्पादन करणे ही या गावांची खासियत आहे. परंतु विद्यमान आमदारांच्या गळचेपी भूमिकेमुळे या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या गावांच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. ताकारी येथील व्यापारी वर्गाचे प्रश्न सोडवलं. ताकारी गावाने केलेले परिवर्तनचा आदर्श तालुक्यातील अन्य गावांनी घेतला. त्यांच्या कुरपळच्या पाहुण्याची सत्ता गेली. कारंदवाडीत ही सत्तांतर झाले. सतत लोकांकडून होणाऱ्या मागणीनुसार विरोधकांना ताकारी येथील कॅनॉलचे साधे पिचिंगचे काम करता आले नाही. मग या ३५ वर्षात त्यांनी कसला विकास केला. आपण आपल्या लाडक्या पाहुण्याला ही जास्त दिवस घरी ठेवत नाही. मग आपण त्यांना इतके वर्षे का सोसतोय. या माणसाने फक्त पाहुणे सोडून कुणाची प्रगती साधली नाही. पण तुम्ही प्रत्येक निवडणुकीत त्यांना मताधिक्य देत आलात. त्यांना तालुक्यात उद्योगधंदे उभारता आले नाहीत. शेजारचा पलूस तालुका २५ वर्षे आपल्या तालुक्याच्या पुढे गेला आहे. आमदारांकडे काम घेऊन गेल्यास त्यांना पाहुण्यांची शिफारस लागते. पाहुण्यांनी शिफारस दिली तरच काम होते. त्यामुळे परिवर्तन घडवा. त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. तसेच मला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. मी जर विकास साधला नाहीतर पुन्हा तुमच्याकडे मते मागायला येणार नाही.
मते तुमची पण स्पर्धा पुढाऱ्यांच्यात…
विरोधक म्हणतात आम्ही आमच्या विविध संस्थांमध्ये बोरगाव, ताकारी व परिसरातील लोकांना नोकऱ्या दिल्या. त्यांचे जीवनमान उंचावले. पण तिथे नोकरी करणाऱ्या लोकांना विचारा त्यांची खरी अवस्था काय आहे. एक एक कर्मचारी रिटायर्ड होईपर्यंत पर्मनंट नाही. तर काही कर्मचाऱ्याची रिटायर्डमेंट व पर्मनंट ऑर्डर तुम्हाला एकाच दिवसाची पाहायला मिळेल. आशा प्रकारे कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्याला खुश करण्यासाठी तुमच्यावर दबाव आणून त्यांना मताधिक्य देण्यासाठी गांवपुढाऱ्यांमध्ये स्पर्धा लागणे दुर्वेवी आहे.











































































