सांगली । इस्लामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत उर्फ राजेंद्र नरहर कुलकर्णी (मुळगाव नांदगाव, ता. कराड) वय 64 यांचे आज दुपारी इस्लामपूर येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी तसेच मुलगा प्रा. डॉ. चैतन्य, चिरंजीव प्रसाद, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी कापूसखेड रोड वरील स्मशानभूमी मध्ये सकाळी नऊ वाजता होणार आहे.
पत्रकार कुलकर्णी यांचा जनसंपर्क खूप व्यापक होता. सडेतोड आणि निर्भिड लिखाणाबद्दल ते प्रसिद्ध होते. राजकरण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यांनी वीस वर्षाहून अधिक काळ पुढारी या दैनिकात पत्रकार म्हणून काम पाहिले. वाळवा तालुक्यात ते राजाभाऊ या नवाने सर्वपरिचित होते.
राजाभाऊ कुलकर्णी या नावाने ग्रामीण तसेच शोध पत्रकार म्हणून त्यांनी साधारणतः 1980 ते 2000 या दोन दशकापेक्षा अधिक कालखंड इस्लामपूर परिसरात पत्रकारिता केली.नकली आणि संवगतेच्या मागे न जाता त्यांनी पत्रकारिता केली. त्यांच्या लिखाणामधून हेच सतत समोर येत राहिले. त्यांच्या जाण्याने जुन्या आणि नव्या पत्रकारितेचा एक दुवा निखळला आहे, हे नक्की. त्यांना ‘अधोरेखित’ परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!