सांगली । कॉमर्स आणि अलीकडील दहा वर्षात ई-कॉमर्स हा मानवी जीवन जगण्याचा मूलमंत्र बनला आहे. प्रत्येक व्यक्तीचे अर्थकारण कॉमर्स केंद्रित झाले आहे; असे प्रतिपादन राजारामबापू बँकेचे संचालक, सनदी लेखापाल सुनील वैद्य यांनी केले.
इस्लामपूर येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कॉमर्स विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कॉमर्स डे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वैद्य बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव एड. धैर्यशील पाटील होते. प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. मंगल लोंढे, कॉमर्स विभाग प्रमुख प्रो. डॉ. अशोक शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थित होती.
प्रारंभी बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स मधील करिअर संधी ते उद्योजकता अशा विविध विषयावर सादरीकरण केलेल्या भित्तिपत्रकाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे वैद्य व ॲड. धैर्यशील पाटील यांच्या हस्ते झाले.
चार्टर्ड अकाउंटंट सुनील वैद्य यांनी कॉमर्स ची अश्मयुगापासूनची माहिती तसेच इतिहास, उत्पत्ती, विकास याबद्दल सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, सध्या स्थानिक स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ई-कॉमर्समुळे जग ही एक जवळची सहज उपलब्ध बाजारपेठ तयार झाली आहे. त्या संबंधित प्रत्येक क्षेत्रात उत्पादन, वितरण, बाजारपेठ, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स अशा ठिकाणी करिअरच्या संधी आहेत.

इस्लामपूर : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये चार्टर्ड अकाउंटंट सुनील वैद्य यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. ए.एम.जाधव बाजूस ॲड. धैर्यशील पाटील, डॉ. मंगल लोंढे, डॉ. अशोक शिंदे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. पाटील म्हणाले,कॉमर्स, टॅक्सेशन, ऑडिटिंग असे विषय व त्याची उपयुक्तता सर्वमान्य झाली आहे. त्यामुळे पदवी शिक्षण घेताना स्वयंरोजगार व तत्सम व्यावसायिक शिक्षण घेतल्यास पदवीनंतर अर्थार्जनाचे मार्ग सुकर होतील.
प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना निरंतर अभ्यास आणि आपल्या ज्ञान, कौशल्याच्या क्षमता वृद्धिंगत कराव्यात.
प्रारंभी प्रो. डॉ. अशोक शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.माहेश्वरी जाधव हिने स्वागत केले, स्नेहा जाधव हिने सूत्रसंचालन तर कु. लक्ष्मी रजपूत हिने आभार मानले. प्रा प्राची कांबळे, प्रा.उल्का घारगे,प्रा. मानसी पाटील, प्रा. ॲड. प्रियांका पाटील, प्रा स्मिता पाटील आदींनी संयोजन केले. आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिवस हा प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारी येत असतो, त्याचे औचित्य साधून घेतलेल्या या कार्यक्रमास बी. कॉम, एम. कॉम आणि डिप्लोमा इन टॅक्सेशनचे विद्यार्थी उपस्थित होते.