३६ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी असे २५० ते ३०० प्रमुख पदाधिकारी प्रतिनिधीत्व करणार
सांगली । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक शुक्रवार दि. ३१ मे, शनिवार १ व रविवार २ जून २०२४ रोजी इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महा.अं.नि.स.राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे,राज्य उपाध्यक्ष प्रा. शामराव पाटील,प्रा.डॉ.नितीन शिंदे यांनी दिली.
संघटनेच्या राज्य कार्यकारिणी चे पदाधिकारी,३६ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी असे २५० ते ३०० प्रमुख पदाधिकारी या राज्य बैठकीत प्रतिनिधीत्व करणार आहेत. या राज्य बैठकीत महा. अं.नि.स.च्या एकूण १९ विभागांच्या कामाचा आढावा, पुढील वर्षभराचे नियोजन केले जाईल. सर्व जिल्ह्यातील कामांचे सादरीकरण आणि पुढील कामाचे भविष्यवेध निश्चित केले जाणार, गटचर्चा ,बौद्धिक सत्रे घेतली जाणार आहेत.सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन आहे. संघटनात्मक धोरण ठरवण्याचे काम या बैठकीत केले जाणार.
शुक्रवार दि.३१ मे रोजी बैठकीचे उद्घाटन वाळवा तालुका इंजिनिअर असोसिएशनचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे (नाना) यांच्या हस्ते होईल.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील (अण्णा)हे असतील. अं. नि. स.चे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील,राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे,राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे,गजेंद्र सूरकार,नंदकिशोर तळाशीलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.राज्य बैठकीच्या निमित्ताने संघटनेच्या वतीने शुक्रवार दि.३१ मे रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे.
जेष्ठ सामाजिक विचारवंत किशोर बेडकिहाळ हे प्रमुख वक्ते असतील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव व माजी प्राचार्य आर. डी. सावंत हे आहेत.या कार्यक्रमास महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.एन.आर. पाटील, वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी आधारस्तंभ पुरस्काराचे वितरण होईल.
दि .३१ मे सायंकाळी सात वाजता इस्लामपूर शहरातील समविचारी, पुरोगामी कार्यकर्ते, पत्रकार, कलावंत, संघटनेचे देणगीदार व जाहिरातदार यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचा सुसंवाद होईल.
शनिवार दि.१ जून सायंकाळी ४ ते ६ या वेळेत अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे राज्यस्तरीय लक्ष्यवेधी व शतकवीर पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ विचारवंत व धरणग्रस्त चळवळीचे नेते डॉ.भारत पाटणकर यांच्या हस्ते होईल. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक प्रा. नितीन शिंदे, उत्तम जोगदंड व संपादक मंडळातील मान्यवर उपस्थित असतील.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.१ जून सायं. ६.३० वाजता इस्लामपूर शहरातून ‘संविधान सन्मान फेरीचे आयोजन केले आहे.राज्य बैठकीचा समारोप ज्येष्ठ संपादक व साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या उपस्थित होईल.
तीन दिवसांची राज्य बैठक विजया सांस्कृतिक भवन इस्लामपूर येथे होणार आहे.वर्षातून एकदा होणाऱ्या विस्तारित राज्य कार्यकारणी मध्ये संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांचे बौद्धिक सामर्थ्य वाढवण्याचे काम केले जाते. राज्य पदाधिकारी माधव बावगे ( लातूर),अविनाश पाटील (धुळे),संजय बनसोडे (इस्लामपूर),डॉ. ठकसेन गोराणे( नाशिक),गजेंद्र सूरकार ( वर्धा), नंदकिशोर तळाशिलकर( मुंबई),शहाजी भोसले( छ्त्रपती संभाजीनगर),विनायक सावळे (नंदुरबार), सुधाकर काशीद (सोलापूर), संजय शेंडे (नागपूर), ॲड.रंजना गवांदे (अहमदनगर), रुकसाना मुल्ला (लातूर) कृष्णात कोरे (कोल्हापूर) विजय परब ,सचिन थिटे (मुंबई) , बबन कानकीरड (अकोला) आदी मार्गदर्शन करणार आहेत. अं.नि.स सांगली जिल्हा कार्याध्यक्ष निलेश कुडाळकर, जिल्हा प्रधान सचिव प्रा. काशिलिंग गावडे,प्रा. रामभाऊ घुले,इस्लामपूर शाखेतील पदाधिकारी प्रा. एल डी पाटील,प्रा.बी आर जाधव,डॉ.सुदाम माने,प्रशांत इंगळे ,अजय भालकर, एम डी जाधव,प्रा.तृप्ती थोरात,अरबाज पटेल ,बजरंग संपकाळ आदी संयोजन करीत आहेत.