सोलापूर । संविधान आणि आरक्षण काढून घेण्याचा अपप्रचार काँग्रेस करित आहे.मात्र समाजातील मागासवर्गीय लोकांना तसेच दलित ओबीसींना विकासापासून दूर ठेवण्याचे पाप काँग्रेसने केले आहे.त्यामुळे त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका संविधान आणि आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही मोदीची गॅरंटी आहे,असा विश्वास पंतप्रधान आणि भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी सोलापूर मध्ये आज व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापूरला आले होते.यावेळी त्यांनी सभेला संबोधित केले.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. सुभाष देशमुख. आ. विजयकुमार देशमुख., आ. समाधान अवताडे आदी उपस्थित होते.
गेल्या साठ – सत्तर वर्षात काँग्रेसमुळे देशाचे नुकसान झाले आहे. ते नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.मोदी म्हणाले, सोलापूरमध्ये दुसऱ्यांदा आलोय, त्यावेळेस काही देण्यास आलो होतो, आता काही तरी मागायला आलो आहे, कारण नंतर मी खूप काही देणार आहे, मला पैसा नको आहे फक्त आशीर्वाद द्या, या निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षात विकासाची गॅरंटी मिळणार आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी आपल्या कलंकित स्वभावाने देशाची सत्तेचे स्वप्न पाहत आहे, मात्र त्यांच्या स्वप्नांचा डब्बा गुल झाला आहे, तुम्ही दहावर्ष मला पाहिले आहे, माझे सर्व निर्णय पहिले आहेत, काम पाहिले आहे, इंडिया आघाडीत नेतृत्वाच्या नावावर भांडण सुरू आहेत. ज्यांच्याकडे ध्येय नाही, अशाकडे देशाची सत्ता देणार आहेत का? पाच वर्षात पाच प्रधानमंत्री हे कसे चालणार, नकली शिवसेनावाले मात्र तसे बोलत आहेत. त्यांच्याकडे तर पंतप्रधान होण्यासाठी अनेकांना स्वप्न पडत आहेत. त्यांना देशाच्या भविष्याची चिंता नाही, त्यांना मलई खायची आहे.
हा महाराष्ट्र महान संतांची भूमी आहे, महात्मा फुले, आंबेडकर सारखी महान व्यक्ती या राज्याने दिली आहेत. काँग्रेसने साठ वर्षांत एसी, एसटी आणि ओबीसी वर्गाच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही,पण मोदींचे तुमच्याशी सहृदय नाते आहे,अहमदाबादमध्ये पद्मशाली समाजाचे लोक आहेत ना त्याचे मी अन्न खाल्ले आहे, ओबीसीना आम्ही संविधानिक दर्जा दिला, त्यांच्या उन्नतीचे निर्णय घेतले, कुणाचाही हक्क हिरावून घेतला नाही, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने काम केले आणि करणार आहे. गेल्या दहा वर्षांत सामाजिक न्यायासाठी खूप काम झाले, हे काम स्वातंत्र्यानंतर कधीही झाले नव्हते. देशातील गरीब मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर करायचे आहे, त्यासाठी आता डॉक्टर आणि इंजिनियर हे शिक्षण मराठीतून देणार आहोत. या निवडणुकीत पुढील पाच वर्षांसाठी विकासाच्या गॅरंटीला निवडा, असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं.
ओबिसीसाठी राजकीय आरक्षण दहा वर्षांतून वाढवण्यात येते ते भाजपा नेते अटलजी आणि आम्ही वाढवले. मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी यांच्या नेत्यांना इतर पक्षांनी मोठं होऊ दिले नाही, बाबासाहेबांना पण उशिरा भारतरत्न देण्यात आला, पण आम्ही त्यांचा सन्मान ठेवत मागासवर्गातील व्यक्तीला देशाचे सर्वोच्च स्थान दिले. त्यानंतर आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले. आज केंद्रीय मंत्रिमंडळमध्ये साठ टक्के लोक ओबीसी आणि मागासवर्गीयांतील नेते आहेत, इंडिया आघाडी वाले आज अपप्रचार करीत आहेत, त्यांच्या भाषणात मुद्दे नाहीत,फक्त मोदींना शिव्या देण्याशिवाय काही नाही, त्यांच्याकडे व्हिजन नाही पण आमच्याकडे जीवन आणि व्हिजन आहे .आता संविधान बदलेल, आरक्षण संपेल, असा प्रचार केला जातो,आज बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनाही आरक्षण थांबवता आलं नसतं, तर मोदींचा प्रश्नच नाही.आरक्षणाला ताकद देण्यास मी तयार आहे. आरक्षणाला जेवढी ताकद देऊ शकतो ती माझ्याकडे आहे,आज मी फक्त तुमच्याकडे मागणे मागतो आहे की मला साथ द्या, आशीर्वाद द्या आणि मला मजबूत करा, असे मोदी यावेळी म्हणाले.
साभार : प्रसार भरती