सांगली । माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून इस्लामपूर येथील दत्त टेकडी परिसर विकासासाठी 5 कोटी 25 लाख 45 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मनगुंटीवार, तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. आ.जयंतराव पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून दत्त टेकडीचा विकास व सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या अथक प्रयत्नास यश आल्याचा आम्हा सर्वांना आनंद झाला असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आ.जयंत पाटील यांनी दत्त टेकडी परिसरात वृक्षारोपण करून पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच या परिसरास कुंपण आदी अनेक कामे केलेली आहेत.या परिसराच्या पुढील विकास व सुशोभीकरणा साठी राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मनगुंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती.त्याप्रमाणे राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मनगुंटीवार यांनी मुंबई येथील त्यांच्या दालनात आ.जयंतराव पाटील व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रस्ताव देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आ. जयंतराव पाटील यांनी सांगली येथे जिल्हा वनसंरक्षक अधिकारी निता कट्टे, उपवन संरक्षक अधिकारी अजित साजने, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एस. कुलकर्णी,स्थापत्य अभियंता प्रमोद चौगुले व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या.
यानंतर आ.जयंत पाटील,स्थापत्य अभियंता प्रमोद चौगुले यांनी दत्त टेकडी येथे प्रत्यक्ष पहाणी करून आराखडा तयार केला.हा आराखडा प्रस्ताव अधिकाऱ्यांच्या मार्फत मुंबईस मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्यास वन मंत्री ना.सुधीर मनगुंटीवार यांनी मंजुरी दिली आहे.यातून इस्लामपूर शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. आ. जयंतराव पाटील यांनी यापूर्वीही अनेक योजना आणून शहराचे वैभव व प्रगतीस चालना दिली आहे.
दत्त टेकडी व परिसराच्या विकासाला मोठा निधी मंजूर करून दिल्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व शहरातील नागरिकांच्या वतीने ना.सुधीर मनगुंटीवार व संबंधित अधिकाऱ्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अँड. चिमणभाऊ डांगे, माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, माजी सभापती खंडेराव जाधव,माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, माजी सभापती विश्वनाथ डांगे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.