ठाणे । ‘धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता.या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या यशानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर 2′ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.’धर्मवीर 2’ या चित्रपटाचा मुहूर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आला.येत्या 9 डिसेंबरपासून ठाणे येथे चित्रपपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
‘धर्मवीर-2’ या चित्रपटाच्या मुहूर्त शुभारंभप्रसंगी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे,आमदार प्रताप सरनाईक,माजी आमदार रविंद्र फाटक,निर्माता मंगेश देसाई,दिग्दर्शक प्रवीण तरडे,मुख्य कलाकार प्रसाद ओक,मंगेश कुलकर्णी,चित्रपटाची निर्मिती टीम व कलाकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्यांचेच आम्हीही अनुकरण करीत आहोत.त्यांनी दिलेल्या संस्कारानुसार आपल्या हातून जनतेचे भले होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे.
ते म्हणाले, ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.धर्मवीर स्व.आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्व स्तरातील घटकांचे कल्याण केले, ते सर्वांसाठी जगले,गोरगरिबांसाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले.त्यांच्याच संस्कारावर व शिकवणीवर आपले शासन काम करीत आहे.गेल्या वर्षभरात शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहे.गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले असून या माध्यमातून अनेक गरजूंना काम मिळणार आहे.समृद्धी महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळण्याच्या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राज्यात यशस्वीपणे राबविला.आजपर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून १ कोटी ८० लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
कोणतीही भूमिका साकारताना सर्वस्व अर्पण केल्यावरच यश मिळते, त्याप्रमाणे हे शासन सदैव गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा विचार करीत काम करीत आहे,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांचे धन्यवाद मानले. सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आणि धर्मवीर स्व.दिघे साहेबांचे लोकसेवेचे कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांनी आवर्जून पाहावे,असे आवाहनही त्यांनी केले.