पत्रकार के लिए सबसे बडी चीज है कलम,
जो न रूकनी चाहिये,
न झुकनी चाहीये,
न अटकनी चाहिए,
और न भटकनी चाहीए…
भारताचे ज्येष्ठ संपादक,पत्रकार आणि प्रतिभावंत साहित्यिक माखनलाल चतुर्वेदी यांच्या या शब्दांचं अगदी मूर्तीमंत स्वरूप म्हणजे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे.माझा देव,माझा आदर्श,गुरुवर्य व पितृतुल्य व्यक्तिमत्व जे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आजअखेर समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्या जाज्वल्य विचारांचा जागर करत आहेत,ते ज्येष्ठ संपादक व विचारवंत मधुकर भावे.
त्यांच्याकडे महाराष्ट्राचा सच्चा वाटाड्या (दिशादर्शक) म्हणून पाहिले जाते.सोमवार दि. 9 ऑक्टोबर रोजी त्यांचा 84 वा वाढदिवस.त्यांनी 1000 पूर्ण चंद्र आणि हजारो पूर्ण सूर्य पाहिले आहेत.महान माणसं पाहिली आहेत, तेवढ्याच महान घटनाही पाहिल्या आहेत.पत्रकाराने एखादी विशिष्ट विचारसरणी फॉलो करावी किंवा नाही,हा हल्ली खूपच चर्चेचा विषय झाला आहे.महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतील की,ज्यांनी विचारसरणीचा पाठपुरावा केला,चळवळीत सक्रिय सहभाग घेतला,यशस्वीही करुन दाखवला.
अगदी लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर,प्र.के.अत्रे यांच्यापासून अलीकडच्या संजय राऊत यांच्यापर्यंत अनेक उदाहरणे सांगता येतील.या सर्वांत एक साम्य म्हणजे,ते फक्त ‘लिहते’ नव्हते तर ‘कर्ते’ सुद्धा होते.आणि त्यांच्या या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारण,समाजकारणावर उमटलेला दिसून येतो.पण प्रदीर्घ अनुभव,व्यासंग आणि महाराष्ट्राच्या स्थापनेपासून प्रत्येक प्रसंगाचा साक्षीदार असलेला,एक निरपेक्ष अवलिया मात्र महाराष्ट्राच्या कौतुकापासून थोडासा दूरच राहिला. वयाची आठहून अधिक दशके वर्षे पार केलेल्या या सळसळत्या रक्ताच्या चैतन्यमूर्तीचं कौतुक महाराष्ट्रानं फारसं केलं नाही,याची खंत माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना जाणवल्याशिवाय राहत नाही, हे खरं.
मधुकर भावे हे मूलतत्ववादी विचारांना प्रखर विरोध करणारे,आपल्या लेखणी आणि वाणीतून जनजागरण घडवून आणणारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक, विचारवंत,राजकीय विश्लेषक. महाराष्ट्रचा चालता बोलता राजकीय,सामाजिक इतिहास त्यांना मुखोदगत् आहे.तर भूगोल तळहातासारखा माहीत आहे. ज्यांनी आयुष्यभर काँग्रेस विचारधारा जपली,ज्यांना काँग्रेस कळली पण काँग्रेसला ते उमगले नाहीत…असे मधुकर भावे.
काँग्रेस हा पक्ष नसून ती एक विचारधारा आहे.सर्वधर्म समभाव,ग्रामीण जीवनातील बदल व सामान्य माणसाची प्रगती या विचारधारेतूनच होवू शकते,याचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्राच्या तळागाळात गेल्या पन्नास वर्षांपासून भावे सर करत आले आहेत.लोकमत वृत्तपत्र समूहात संपादक असताना तर त्यांनी अनेक अग्रलेख व लेखातून काँग्रेसचे विचार वाडी – वस्तीपर्यंत पोहचवले.महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आत्तापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांशी (एखादा अपवाद वगळता) त्यांचे सलोख्याचे संबंध राहिलेत.राज्याच्या विकासाच्या निर्णयात भावे साहेबांचे मत महत्त्वपूर्ण मानले जाते.जुन्या जाणत्याबरोबर तरुणांनाही भावे साहेबांचे विचार भावतात,कारण ते वास्तव असतात.म्हणूनच त्यांच्या भाषणाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. कितीतरी वर्षापूर्वीच्या आठवणी त्या अगदी काल परवा घडल्या प्रमाणे सांगत असतात. त्यांच्या या ,’पिन पॉइंट मेमरीचं’ आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.त्यांची भाषणं ऐकण म्हणजे एक प्रकारची मेजवानीच असते. काँग्रेसचे अनेक आयाराम – गयाराम त्यांनी बघितलेत. गांधी विचार हा त्यांचा ध्यास आणि श्वास. भावे साहेबांचा उतरत्या वयात ही उत्साह,तळमळ कमी झालेली नाही.
पुराेगामी विचारांनी धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र घडला.ज्या पुराेगामी विचारांनी महाराष्ट्र अबाधित,अखंड ठेवला,त्या विचारांची नव्या पीढीला ओळख करून देण्याची गरज आहे.अशावेळी महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील एक नाव ठळकपणे समाेर येतं,ते म्हणजे मधुकर भावे सरांचं.
भावेसाहेब संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनचे साक्षीदार.तेव्हापासून आजअखेर ते सर्वसमावेशक विचार घेऊन पत्रकारिता करत आहेत.आजही आपल्या त्याच भूमिकेचा ‘घेतला वसा टाकणार नाही’ असा कैवार घेणारे,त्यासाठी वाणी आणि लेखणी झिजवणारे भावे साहेब महाराष्ट्रात जिथे जिथे जातील तिथे ते पुरोगामी विचारांचा जागर करून ते विचार रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत.म्हणून त्यांना महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा ‘वाटाड्या’ संबोधले जाते. तत्व आणि विचारांची बांधिलकी भावे साहेबांनी कधीही सोडली नाही.श्रद्धेत खोट नाही आणि निष्ठेत फट नाही,असं हे व्यक्तिमत्व. निरपेक्षपणे पुरोगामी विचार तेवत ठेवण्याचे काम ते करत आहेत.महाराष्ट्राचा रस्ता अन रस्ता,कार्यकर्ता अन कार्यकर्ता,त्यांचे रंग ढंग त्यांना तळ हातावरच्या रेषेसारखे पाठ आहेत.भावे साहेब पेन आणि कागदाला वाहून घेतलेले व्रतस्थ संपादक आहेत.या वयातही त्यांची लेखणी तरणीबांड आहे.त्यांचा उत्साह व काम करण्याची पद्धत तरुणांना लाजवेल अशीच आहे.‘वार्धक्यपरी शैशवास जपणे’ हे त्यांच्या स्वभावात उपजत दिसते.त्यामुळे त्यांचे सर्व वयोगटात मित्र आहेत.भावे साहेबांच्या तत्त्वनिष्ठा आणि उत्साहाला सलाम!
सत्यनिष्ठ पत्रकारीता आज व्हेंटीलेटरवर असतानाही चौथ्या स्तंभाचा हा वृतस्थ योगी आपल्या लेखणीच्या माध्यमातुन झोपलेल्या समाजाला आणि झोपेचं सोंग घेतलेल्या काही नेतेमंडळींना जागं करण्याचं काम अविरतपणे करत आहे.अनेक प्रलोभनं समोर आली,अनेक संकटं उभी ठाकली पण सत्यनिष्ठ पत्रकारितेला वाहुन घेतलेले भावे सर कधीच मागे हटले नाहीत,किंवा त्यांनी त्यांचा मार्गही बदलला नाही.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते आधुनिक महाराष्ट्र आणि आजअखेर या राज्याच्या सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय घडामोडीचा डोळस साक्षीदार असलेले भावे सर म्हणुनच आम्हा सर्वांसाठी एक दीपस्तंभ आहेत.
तलवारीपेक्षाही धारदार लेखणीनं,ढोंगी राजकारण्यांना सळो की पळो करून सोडणारे आचार्य प्र. के. अत्रे यांच्या सडेतोड पत्रकारितेचा वारसा,महात्मा गांधींची सत्यनिष्ठता आणि सर्वसामान्य जनतेशी असलेली अखंड बांधीलकी,हाच भावे सरांचा श्वास.पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आजच्या दुस-या, तिस-या पिढीतल्या राजकारण्यांपर्यंत अत्यंत चांगला संपर्क आणि सुसंवाद, हे भावे सरांचं,प्रत्येकालाच भावणारं एक वैशिष्ठय. हेच नातं आजही आपल्या हदयात अखंडपणे जपत महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी आजही स्वतःला वाहुन घेतलंय.अनेक प्रतिथयश दैनिकात काम करताना भेटलेली माणसं,त्यांच्याकडंन आलेले बरे – वाईट अनुभव,आपल्या पत्रकारीतेच्या चष्म्यातुन मांडणारे भावे साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय जडणघडणीचं एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे, जे यापुढच्या अनेक पिढयांपर्यंत खरा महाराष्ट्र पोहोचवत राहीलं.माणुस आणि माणुसकीच्या बाजुनं त्यांना भक्कमपणे उभे करत राहील. आज वयाची किंवा तब्येतीची कसलीही काळजी न करता,भावे सर अथकपणे महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जात आहेत. खरा इतिहास समजावुन देत आहेत आणि नव्या पिढीचं प्रबोधन करत आहेत,ज्याची आज अत्यंत गरज आहे. आज या वाढदिनी त्याना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, हीच सदिच्छा.सच्चा महाराष्ट्र पाठिशी असणा-या या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या या कार्याला उदंड बळ लाभो, हीच श्री साईचरणी प्रार्थना !