श्राद्ध निर्णय,कोणती कामे करावीत /करू नयेत
॥ॐ नमः शिवाय ॥
या वर्षी म्हणजे शके 1945 दि.18 जुलै 2023 पासून अधिक श्रावण मासारंभ आणि दिनांक 17 ऑगष्ट 2023 पासून पुढे निज श्रावण सुरु होतो आहे.
श्रावण पौर्णिमेच्या जवळ श्रवण नक्षत्र येत असल्याने या मासाला श्रावण मास असे म्हणतात .
वर्षा ऋतूचा पहिला महिना म्हणून या महिन्यात बहुतेक दर दिवशी वार,व्रते,उपोषण म्हणून आपल्या धर्मकृत्यांमध्ये या मासाला महत्व आहे,म्हणून या मासाला पवित्र श्रावण मास असे म्हणतात .
श्रावण मासात व्रत आणि उपोषणाला महत्त्व आहेच.पण याच बरोबर अधिक मासाला तर,उपोषणाच्या बाबतीत त्यापेक्षा विशेष महत्त्व आहे.या मूळे या वर्षी,सन 2023 साली श्रावण…त्याच बरोबर अधिक श्रावण असे दोन मास आल्यामुळे आपले पुण्य पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत .
उदा . बरेच जण श्रावण मासात सोमवार व्रत्त आणि उपवास करतात.त्याच बरोबर अधिक श्रावण मासातील सोमवार व्रत आणि उपवास केल्यास अधिक पुण्यदायक म्हणायला हरकत नाही.
पण,यावर्षी आपण आपल्या भागात श्रावण अधिक आहे. मग श्रावणी सोमवारचा उपवास दोन्ही महिन्यात करायचा का ?
यावर्षी अधिक श्रावण महिना 18 जुलै ते 16 ऑगस्ट पर्यंत असून त्यानंतर 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत निज (शुद्ध) श्रावण महिना आहे.अमांत मास पद्धती प्रमाणे महाराष्ट्र,गुजरात,कर्नाटक,आंध्र या प्रदेशात श्रावण महिन्यातील सर्व व्रते,सोमवारचे उपवास,मंगलागौरी पूजन इत्यादि निज श्रावण (शुद्ध) महिन्यात करावे.
(आपल्या कडील प्रदेशात श्रावणाचे ८ सोमवार नाहीत)
उत्तर भारतात पौर्णिमांत पद्धती असून तिकडे 4जुलै पासून श्रावण कृष्ण पक्ष सुरु होत असल्याने त्या प्रदेशात श्रावण महिन्यातील पूजा, उपवास हे दोन महिने करण्याची प्रथा असल्याने 4 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत करता येतात.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात या प्रदेशात मात्र शुध्द श्रावणात एक महिनाच श्रावणातील पूजा, व्रत करावीत.
अधिक मासाचे महत्व…
अधिक मासात श्रीपुरुषोत्तम प्रित्यर्थ महिनाभर उपोषण, अयचित,नक्त भोजन अथवा एक भुक्त करावे.अशक्ताने या चार प्रकारापैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा असे शास्त्रांत आहे.
या मासात तांबुल दान दिल्याने – सौभाग्य प्राप्ती .
देवापुढे अखंड दीप लावल्यास- लक्ष्मी प्राप्ती .
निदान एक दिवस गंगा स्नान केल्यास – सर्व पाप निवृत्ती
मौनभोजन केल्यास -पापाचे निरसन
हेही वाचा : छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
या मासात अपूप दाणाचे विशेष महत्त्व आहे.शक्य असेल त्यांनी या मासात नित्य अपूपदान करावे.शक्य नसेल त्यांनी निदान शुक्ल व कृष्ण द्वादशी ,पौर्णिमा , कृष्ण अष्टमी , नवमी ,चतुर्दशी अमावस्या या तिथीस आणि व्यतिपात व वैधृती असेल त्या दिवशी तर अपूपदान करावे .
अती अशक्ताने वरील दिवसापैकी एका दिवशी अथवा श्रद्धा भक्ती उत्पन्न होईल अशा दिवशी अपूप दान करावे.
अपूप म्हणजे अनारसे दान
33 अपूप दान देईल याला – पुत्र पौत्र व विपुल संपत्ती प्राप्त होईल असे शास्त्र आहे.
अधिक मासात कोणती कामे करावी / कोणती करू नये.
हेही वाचा : वास्तु म्हणजे काय ?
अधिक मासात कोणती कामे करावीत?
नित्य व नैमित्तिक कर्मे ,
जी कामे केल्यावाचून गती नाही अशी कर्म करावी .
ज्वरशांती,पर्जन्येष्टी,देवाचे पुन्: प्रतिष्ठा,ग्रहण श्राद्ध,जातकर्म,नामकरण,अन्नप्राशन हे संस्कार तसेच मन्वादी व युगादी संबंधी श्राद्धादी कृत्ये,तीर्थ श्राद्ध,दर्श श्राद्ध,नित्य श्रद्ध,विश्वकल्याणासाठीचे याग,मंगल कार्यापूर्वीचे ग्रहमख इत्यादी अंगभूत कर्मे करता येतील.
साखरपुडा,डोहाळे जेवण अर्थात वास्तुशांती न करता लौकिक गृहप्रवेश,जागा/वास्तू खरेदी विक्री व्यवहार इत्यादी गोष्टी करता येतील.गंगा,गया आणि गोदावरी या तीर्थक्षेत्री नारायण – नागबली त्रिपिंडी यासारखी कर्मे करता येतील.थोडक्यात अगतिक कर्मे करता येतील.
अधिक मासात कोणती कर्मे करू नयेत?
काम्यकर्माचा आरंभ व समाप्ती,
महादाने,गृहारंभ,वास्तुशांती,संन्यास ग्रहण नुतनव्रत्तग्रहणदीक्षा,विवाह उपनयन,चौल,नूतन देवप्रतिष्ठा,काम्ययाग ही कर्मे तसेच साठी,पंच्याहत्तरी इ . सारख्या शांती करू नयेत .
महालय श्राद्ध करू नये .
थोडक्यात सगतीक कर्मे करता येणार नाहीत,ती अधिक मास संपल्यानंतर करावीत.
हेही वाचा : बहे रामलिंग बेट ठरतेय पर्यटकांचे आकर्षण
अधिक मास असता श्राद्ध केव्हा करावे ?
ज्या महिन्यात निधन झाले असेल तोच महिना अधिकमास येतो तेव्हा प्रथम वर्षश्राद्ध त्या अधिक महिन्यातच करावे.
शके 1944 च्या अर्थात गेल्या वर्षी श्रावण महिन्यात मृत्यू झाला असेल तर त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध शके 1945 च्या या वर्षी अधिक श्रावण महिन्यात त्या तिथीला करावे .
दरवर्षीचे श्रावण महिन्यातील प्रतिसांवत्सरिक श्रद्ध यावर्षी निज श्रावण महिन्यात करावे.
मात्र पूर्वीच्या अधिक श्रावण महिन्यात मृत्यू झालेल्यांचे प्रतिसांवत्सारिक श्राद्ध यावर्षी अधिक श्रावण महिन्यात करावे.
याशिवाय गेल्या वर्षी शके 1944 मध्ये भाद्रपद,आश्विन इत्यादी महिन्यात मृत्यू झालेल्यांचे प्रथम वर्षश्राद्ध त्या त्या महिन्यात त्यांचे तिथीलाच करावे.
13 महिने होतात म्हणून एक महिना अधि करू नये .
तसेच यावर्षी अधिक श्रावण किंवा निज श्रावणात मृत्यू झाल्यास त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध पुढील वर्षी श्रावण महिन्यात त्या तिथीला करावे .
पंचांगाधार -दाते पंचांग