Last Updated on 24 Aug 2024 11:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार
मुंबई | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे. त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.
आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री कु.तटकरे यांनी केले आहे.











































































