Last Updated on 18 Jul 2023 2:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । पुढील 4 दिवस राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.रायगड,रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात 21 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पालघर,ठाणे,मुंबई,सिंधुदुर्ग,जळगाव,कोल्हापूर,सातारा,औरंगाबाद,जालना,अकोला,अमरावती,बुलढाणा,वर्धा,वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अलिबाग : भारतीय हवामान विभाग यांचेकडील हवामान विषयक पूर्वसूचनांनूसार दिनांक 21 जुलै, 2023 पर्यंत रायगड जिल्हयामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ऑरेंज अलर्टच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे.त्यानुषंगाने जिल्हयातील सर्व नागरिकांना व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा – शुभसंयोग : श्रावण…अधिक श्रावण मास; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
या कालावधीत समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जावू नये. तसेच अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता राहिल. समुद्रास असणारी भरती,अतिवृष्टी, व धरणांतून सोडण्यात येणारा विसर्ग यामुळे पूरप्रवण, सखल भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरुन पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच कमी वेळेत अतिवृष्टी होत असल्याने दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे दरड व पूरप्रवण भागांतील नागरिकांनी अतिवृष्टीचा इशारा
लक्षात घेऊन सतर्क रहावे. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, त्याचप्रमाणे जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी बांधावीत अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसिल कार्यालय / पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या 02141-222097 / 222118 व 8275152363 अथवा टोल फ्री क्रमांक 112 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले आहे.
दरम्यान,पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.










































































