Last Updated on 18 Jan 2025 5:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजनेंतर्गत आज मालमत्ता धारकांना, ६५ लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्ड अर्थात मालमत्ता पत्रांचं, दूरदृश्य प्रणालीद्वारे वितरण केलं. १० राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या २३० हून अधिक जिल्हयातल्या ५० हजारांहून अधिक गावांचा यात समावेश आहे. यावेळी पंतप्रधानांनी राज्यातल्या विविध ठिकाणच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यामुळे मोठा लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनच्या मदतीनं देशातल्या प्रत्येक गावातील घरं आणि जमिनीचं मॅपिंग-नकाशा आरेखन केलं जाईल, गावातल्या लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेची कागदपत्रं दिली जातील, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
स्वामित्व योजनेमुळे गावांच्या विकासाचं नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये चांगली प्रगती झाली आहे. यासह अनेक योजनांमुळे देशातील ग्रामीण भागाचा कायापालट होत आहे असं सांगत त्यांनी या योजनांचं महत्त्व अधोरेखित केलं. ग्राम स्वराज्य ही संकल्पना वास्तवात उतरवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असून, स्वामित्व आणि भू-आधार ग्रामीण विकासाचा आधार ठरल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. विकसित भारताच्या उभारणीत, महिला शक्तीची मोठी भूमिका आहे, गेल्या दशकभरात आमच्या प्रत्येक मोठ्या योजनेत महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
गावातल्या जनतेला मालमत्तेचा हक्क देत, ग्रामीण भारताची अधिक आर्थिक समृध्दी साध्य करण्याच्या उद्देशानं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वामित्व योजना सुरु करण्यात आली आहे. यामुळे, बँकाद्वारे कर्ज घेणं शक्य होतं, तसंच मालमत्तेशी संबंधीत तंटे कमी होण्याबरोबरच, ग्रामीण भागात मालमत्तेचं आणि मालमत्ता कराचं मुल्यांकन सुलभ होतं. याशिवाय ग्रामस्तरावर सर्व समावेशक नियोजनालाही सहाय्य होतं. ३ लाख १७ हजारांहून जास्त म्हणजेच, नियोजित खेड्यांपैकी ९२ टक्के खेड्यांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. आत्तापर्यंत १ लाख ५३ हजारांहून जास्त गावांसाठी सुमारे २ कोटी २५ लाख मालमत्तापत्रं तयार करण्यात आली आहेत. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालं आहे.
साभार : प्रसार भारती
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Aug 2026 8:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्... Read more












































































