Last Updated on 04 Aug 2024 8:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू समूहाने सातत्याने कौटुंबिक नाते जपले असून राज्यात फार कमी ठिकाणी असे कौटुंबिक नाते पहायला मिळते. भविष्यात आपल्या समूहातील संस्थांनी आपल्यातील संवाद व समन्वय वाढवित कर्मचाऱ्यांच्या बौध्दिक व शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावे,अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी केले. आपण राज्यात फिरत असल्याने आपणास टार्गेट केले जाऊ शकते. चिंता करू नका,मात्र गाफील राहू नका,असे आवाहनही त्यांनी केले.
इस्लामपूर येथे वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाच्या वतीने राजारामबापू पाटील शिक्षण व उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक,राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतीक पाटील,राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील,राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,राजारामबापू सहकारी दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी. सावंत,महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले,साखर कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे प्रामुख्याने उपस्थित होते.प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
आ.पाटील पुढे म्हणाले,आपल्या राज्या तील वाढत्या राजकीय प्रभावातून शिक्षण संस्थेसह आपल्या संस्थांची प्रगती झाली आहे. बँक भक्कम स्थितीत आहे,मात्र साखर कारखाना व दुध संघास खाजगी संस्थांच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी चे सरकार येण्यासारखे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मला राज्यात फिरावे लागणार असल्याने आपण आपल्या भागाची जबाबदारी घेऊन कामाला लागावे.
हेही वाचा – सचिन पाटील वाळवा-इस्लामपूरचे नवे तहसीलदार; प्रदीप उबाळे यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली
आ.मानसिंगराव नाईक म्हणाले,आपल्या समूहात ६ हजार कर्मचारी काम करीत असून दर महिन्याला कोट्यावधी रुपयांचा पगार केला जात आहे. साहेबांनी संस्थात्मक व राजकीय पाया भक्कम केला आहे. नव-नवे तंत्रज्ञान व आधुनिकतेला साजेसे प्रतिकदादा यांचे युवा नेतृत्व आहे.
प्रतीक पाटील म्हणाले,आपल्या समूहाने आत्मीयता व जिव्हाळा जपण्याचे काम केले आहे. सध्या आम्ही खाजगी कंपन्याप्रमाणे आपल्या कामगारांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भविष्यात तरुणांना करिअरबाबत मार्गदर्शन करताना खेळांच्या सुविधा देणार आहोत.
पी.आर.पाटील म्हणाले,राज्यातील साखर कर्मगारांचा वेतन श्रेणीचा प्रश्न मार्गी लावणे साठी प्रयत्नशील आहोत. यावेळी प्राचार्य आर.डी.सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी विजय पाटील,विनायक पाटील,विजयराव यादव,बाळासाहेब पाटील,विठ्ठल पाटील,सुस्मिता जाधव,कार्यकारी संचालक आर.डी. माहुली,विकास कर्डीले,प्रदीप बाबर यांच्यासह राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहातील पदाधिकारी,संचालक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी कामगार नेते शंकराव भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. साखर कामगार संघाचे कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचान केले.
हेही वाचा – पुणे महसुल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या







































































