Last Updated on 09 Feb 2022 9:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
द्विवर्षपूर्तीनिमित्त विशेष उपक्रम
पुण्यामार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेससह पाच एक्सप्रेसवरुन मोहीम सुरू
‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’वर विकासकामांची माहिती
पुणे |
गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नाविन्यपूर्ण माध्यमांचा पुरेपूर वापर करत आहे.आतापर्यंत केवळ खासगी आणि केंद्र शासनाच्या उपक्रमांद्वारे वापरल्या जाणाऱ्या रेल्वे डब्यांवर जाहिराती ‘रॅप’ करण्याची संकल्पना राज्य शासनानेही अवलंबली असून पाच एक्सप्रेस रेल्वेगाड्यांवर शासनाच्या कल्याणकारी कामाच्या जाहिराती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
पुण्यामार्गे धावणाऱ्या लातूर एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस तसेच महाराष्ट्र एक्सप्रेसचा यात समावेश आहे. याशिवाय दादर- सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आणि मुंबई- नागपूर नंदीग्राम एक्सप्रेसवरही या जाहिरात संकल्पना प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडी शासनाकडून राज्यात विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यांची माहिती राज्यातील सर्व जनतेपर्यंत पोहोचवून अधिकाधिक जनतेने लाभ घ्यावा यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार’ या मोहिमेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यात करण्यात आलेल्या विविध कामांचा उल्लेख करण्यात आला आहे.
शेती, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, पायाभूत सुविधा उभारणी, पर्यटन, उद्योग, रोजगार निर्मिती, सामाजिक, सांस्कृतिक वारसा जतन आदी क्षेत्रात राज्य शासनाचे विविध उपक्रम सुरू आहेत. दोन वर्षात राज्य सरकारने अनेकविध विकासकामे केली आहेत. त्यांची माहिती या एक्स्प्रेसवर प्रदर्शित करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी 7 फेब्रुवारीपासून या अभियानाला सुरुवात झाली असून एक महिना हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सोबतच युवकांमध्ये कौशल्य निर्मिती व्हावी, त्यांच्या हाताला काम मिळावे, त्यासाठी जिथे ‘सारथी’ तिथे प्रगती, क्षमता आणि कौशल्य, वृद्धीसाठी शिक्षण- प्रशिक्षण आदींची माहिती देण्यासोबतच ‘माझी वसुंधरा’ आणि संयुक्त राष्ट्र हवामानबदल परिषदेत पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्यामुळे आश्वासक नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच कोकणातील समुद्रकिनारे, येथील पर्यटन वाढीस राज्य शासन चालना देत असून, येथे देश–विदेशातून पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच त्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर विमानसेवेचा प्रारंभ झाल्याचाही उल्लेख आहे.











































































