Last Updated on 11 Nov 2024 6:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणीसारख्या विविध योजना सुरू करून त्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊले उचलली. या योजना निशिकांत भोसले-पाटील यांनी तळागाळात पोहचवल्याच पण याबरोबरच त्यांनी इस्लामपूर मतदार संघातील माता-भगिनी निरोगी राहाव्यात म्हणून निशिकांतदादा लाडकी बहीण योजना सुरू करून त्यांना खरा आधार दिला. त्यामुळे निशिकांत भोसले-पाटील हेच लाडक्या बहिणींचे भाव असल्याची त्यांची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. त्यामुळे या निवडणुकीत या त्यांच्या लाडक्या बहिणीच परिवर्तन घडवतील, असा विश्वास सुनीता भोसले-पाटील यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ बैठकीत त्या बोलत होत्या. दरम्यान, त्यांनी भवानीनगर, फार्णेवाडी (बो), तुजारपूर, गाताडवाडी, आहिरवाडी येथे मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या व संवाद साधला. यावेळी तैसीन आत्तार, सुरेखा जगताप, स्नेहल नायकवडी, धनश्री रसाळ प्रमुख उपस्थित होत्या.
सुनीता भोसले-पाटील म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांपासून पायाला भिंगरी बांधून निशिकांत भोसले-पाटील इस्लामपूर मतदार संघाची सेवा करत आहेत. कोरोना व महापुराच्या काळात त्यांनी चांगले काम केले आहे. महापुरात पूरप्रवण क्षेत्रातील अनेक महिलांचे संसार वाचवण्यासाठी त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करुन पूर ओसरूपर्यंत त्यांची सगळी व्यवस्था केली. पूर ओसरल्यानंतर त्यांच्या घराची परिसराची स्वच्छता, निर्जंतुकीकरणासाठी गाड्या पाठवून औषध फवारणी केल्या. प्रकाश हॉस्पिटलमार्फत आरोग्य सेवा पुरवली. एवढ्यावरच ते न थांबता ते आता प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांना मोफत आरोग्य सेवा देत आहेत. आजपर्यंत तुम्ही ज्यांना निवडून दिले त्या साहेबांनी इतक्या वर्षात तुमच्यासाठी काय केलं, असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. महायुती सरकारने जनतेवर योजनांचा पाऊस पाडला आहे. एसटी पासून ते दवाखान्यापर्यंत, लाडकी बहीण ते शालेय शिक्षणापर्यंत, मोफत राशन अशा सर्वच गोष्टीमध्ये लोकांना लाभ होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा तुम्हाला ५० रुपये तरी मिळाले का? म्हणून हे महायुती सरकार पुन्हा येण्यासाठी आपण सर्वांनी आत्मचिंतन करून बदल घडवा व निशिकांतदादांना विधानसभेत पाठवा.
यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अन साहेबांनी नेमले होते वाचमेन…
महापूर काळात कृष्णाकाठ उद्धवस्थ झाला होता. शेती, व्यवसाय, घरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेली होती. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवला होता. त्यावेळी निशिकांतदादांनी स्वखर्चातून स्वतःच्या शेतातील ऊस तोडून पशु पालकांना पोहच केला. दुसरीकडे येथील आमदारांनी त्यांचा ऊस शेतकरी जनावरांना तोडून नेतील, या भीतीपोटी त्या ऊस शेतीला कारखान्याचे वाॅचमेन तैनात करून संरक्षण दिले, हे येथील शेतकरी विसरलेला नाही. त्यामुळे यंदा परिवर्तन नक्की आहे, असे ही सुनीता भोसले-पाटील म्हणाल्या.







































































