Last Updated on 31 Oct 2024 7:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
पालघरमध्ये ४ कोटी २५ लाखांची रोकड पोलिसांकडून जप्त
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात, दादरा नगर हवेली आणि दमन या यांच्या सीमांवर पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान आज दादरा नगर हवेली मधून महाराष्ट्रात येणाऱ्या चारचाकीतून तब्बल ४ कोटी २५ लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. ही चारचाकी दादरा नगर हवेली मधून उधवा मार्गे महाराष्ट्रात येत होती. तलासरी मधल्या उधवा नाक्यावर तपासणी दरम्यान यात करोडोंची रोकड असल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर ही चारचाकी तलासरी पोलिसांनी उधवा इथून ताब्यात घेतली. ही रोकड सध्या तलासरी पोलिसांनी ताब्यात घेतली असून ही रोकड नेमकी कुठे नेली जात होती याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे.











































































