Last Updated on 24 Jun 2025 6:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीबाबत त्रिपक्षीय समितीच्या बैठका झाल्या. मात्र समितीत एक मत होऊ न शकल्याने हा विषय सहकार उद्योगाचे आधार स्तंभ,राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार यांच्या एक सदस्यीय लवादाकडे दिला आहे. खा.शरदचंद्र पवार हे राज्यातील साखर कामगारांच्या हिताचा योग्य निर्णय लवकरच जाहीर करतील,असा विश्वास माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी राजारामनगर येथे बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे नूतन जनरल सेक्रेटरी राऊ पाटील (कोल्हापूर), कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण (नवेखेड) यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व वाळवा तालुका राष्ट्रीय साखर संघ (इंटक) च्या वतीने हा सत्कार करण्यात आला. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील,उपाध्यक्ष विजयराव पाटील, प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, खजिनदार प्रदीप बनगे, सचिव संजय बोरमाळे, दिलीप भोरे, तानाजीराव खराडे, मोहनराव शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आ.पाटील म्हणाले, राज्यातील साखर कामगार चळवळीत साथी किशोर पवार,बी. आर.पाटील, आर.बी.शिंदे, शंकरराव भोसले यांनी मोठे योगदान केलेले आहे. तोच विचार व वारसा पुढे नेत नूतन पदाधिकारी साखर कामगारांना न्याय मिळवून देतील. कामगारांनी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करून संस्थेच्या प्रगतीस हातभार लावावा, आपल्या कुटुंबास वेळ द्यावा. यावेळी त्यांनी अनेक जुन्या घटना-प्रसंगांना उजाळा दिला.
राऊ पाटील म्हणाले, राज्यातील सहकार चळवळ टिकविण्यात कामगारांनी आपली जबाबदारी पार पाडावी. साखर कारखाना हीच आपली रोजी-रोटी असल्याचे कायम भान ठेवावे.
राजेंद्र चव्हाण म्हणाले, कामगार नेते स्व.शंकरराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २१ वर्षापासून काम करीत आहे. आ. जयंत पाटील, संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, जनरल सेक्रेटरी राऊ पाटील यांच्या आशिर्वादाने राज्यावर कामाची संधी मिळाली आहे. सर्वांचा विश्वास सार्थ करू.
वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील, संचालक विठ्ठल पाटील, कार्तिक पाटील, राजकुमार कांबळे, डॉ.सौ.योजना शिंदे- पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, कामगार प्रतिनिधी विकास पवार, खजिनदार सचिन कोकाटे, योगेश पवार यांच्यासह अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार प्रतिनिधी मनोहर सन्मुख यांनी आभार मानले. प्रसिध्दी अधिकारी विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.
भर पावसातही सत्कार समारंभ!
कारखान्याच्या गेटवर हा सत्कार समारंभ सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. मात्र आ.जयंतराव पाटील,प्रतिकदादा पाटील, तसेच कामगार व अधिकारी जागेवरून हलले नाहीत. कार्यक्रम पुढे चालू राहिला. थोड्या वेळाने पाऊस थांबला.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 21 Jan 2026 1:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च २०२६ दरम्यान उच्च माध्... Read more















































































