Last Updated on 30 Jan 2025 5:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख शुध्द ऊस रोपे उपलब्ध करून देणार आहे. ऊस उत्पादन वाढीत शुध्द बियाणे,खत व पाण्याचे योग्य नियोजन महत्वाचे आहे. शेतकऱ्यांनी बाळ भरणी करावी.यातून एकरी ४-५ टन ऊसाचे उत्पादन वाढू शकते,असा विश्वास कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी इस्लामपूर येथे व्यक्त केला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,संचालक शैलेश पाटील, माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील, संचालक हणमंतराव माळी, युवराज पाटील, कलाकार मानधन समितीचे माजी अध्यक्ष एम.जी.पाटील,ॲड.संपतराव पाटील, आनंदराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा – ‘राजारामबापू’ च्या ऊस विकास समितीच्या अध्यक्षपदी अमरसिंह साळुंखे
सुजयकुमार पाटील पुढे म्हणाले, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शन व कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जात आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना कमी दरात जैविक,सेंद्रिय खते,तसेच कमी दरात माती परिक्षण करून दिले जात आहे. शेतकऱ्यांनी खोडवा,नेडवा ऊस पिक घ्यावे. यामध्ये खर्चाची बचत होते. खोडवा पिकाचे योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळते.

उरुण इस्लामपूर येथील ऊस उत्पादक शेतकरी प्रशिक्षण शिबीराचे उदघाटनप्रसंगी प्रा.शामराव पाटील. समवेत सुजयकुमार पाटील, संचालक विठ्ठल पाटील, शैलेश पाटील, हणमंत माळी,ॲड.संपतराव पाटील,युवराज पाटील ,नितीन पाटील, दिग्विजय पाटील, संजय पाटील व मान्यवर
यावेळी कारखान्याच्या शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी कारखान्याच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील, प्रगतिशील शेतकरी संजय पाटील, शेती अधिकारी नितीन पाटील, पोपट पाटील (सर), उत्तम माने, प्रल्हाद शिंदे, बी.के.पाटील,अशोक पाटील, दिग्विजय पाटील, गटाधिकारी संग्राम पाटील, जयकर साटपे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी संचालक शैलेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.युवराज पाटील यांनी आभार मानले.











































































