Last Updated on 04 Nov 2021 11:31 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
महामार्गांवर अनेक अपघात होत असतात. मात्र वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागतो. वर्ष 2030 पर्यंत रस्ते अपघातात बळी पडणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्यांची संख्या निम्म्यावर आणण्याचे लक्ष्य जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केले आहे.
ठरविलेल्या वेळेच्या पाच वर्ष आधीच म्हणजे 2025 मध्येच हे लक्ष्य गाठण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आधी अत्यंत कठोर नियमांसह मोटार वाहन कायदा 2021 लागू करण्यात आला.
आता रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या लोकांना वेळेवर रुग्णालयात पोहोचविणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहनपर रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने घेतला आहे.याअंतर्गत 5 हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस दिले जाणार आहे. संकटात सापडलेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त 5 वेळा बक्षीस देता येणार आहे.
राष्ट्रीय पातळीवर सर्वात अधिक प्रामाणिक 10 व्यक्तींना 1-1 लाख रुपयांचा पुरस्कार देखील देण्यात येणार आहे.मंत्रालयातर्फे लवकरच एक पोर्टल सुरु केले जाणार आहे. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या लोकांची संपूर्ण माहिती दर महिन्यात या पोर्टलवर संकलित केली जाईल









































































