Last Updated on 21 Jun 2025 10:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
मुंबई | पुणे विभागात झालेल्या पावसामुळे नद्यांमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.
राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाण्याची आवक ६३ हजार ६४५ क्युसेक इतकी होत असुन सद्यस्थितीत धरणात ७२.७९ टक्के इतका पाणी साठा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर असून अतिवृष्टीमुळे दापोली, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये झाड कोसळून आणि भिंत पडून खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तसेच पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेल्याची नोंद झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग १७३ किमी ३०/६०० चिपळूण तालुक्यातील अंजवेल- रानवेल- पलटणे-श्रृंगरतली- कोटलूक- आबोली- भडगाव चारवेली रास्ता खचला असून या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन केंद्राने कळविले आहे.
राज्यात मागील २४ तासांमध्ये (२१ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ३४ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७.९ मिमी, कोल्हापूर २३.७ मिमी, रायगड जिल्ह्यात १२.४ मिमी आणि पालघर जिल्ह्यात ११.४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात कालपासून आज २१ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ७.९, रायगड १२.४, रत्नागिरी ३४, सिंधुदुर्ग २७.९, पालघर ११.४, नाशिक ७.९, धुळे ०.१, नंदुरबार १.३, जळगाव ०.२, अहिल्यानगर ०.२, पुणे ४.२, सोलापूर ०.४, सातारा १०.६, सांगली ६.१, कोल्हापूर २३.७, छत्रपती संभाजीनगर ०.९, जालना ०.४, लातूर ०.५, धाराशिव ३.२, नांदेड ०.१, परभणी ०.३, हिंगोली २.५, बुलढाणा ०.३, अकोला ०.४, वाशिम ०.१ अमरावती ०.१, यवतमाळ ०.३, वर्धा ०.३, नागपूर ०.१, भंडारा ०.७, गोंदिया ०.५, चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पालघर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू, जालना जिल्ह्यात वीज पडून दोन प्राण्यांच्या मृत्यू, ठाणे जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू, नाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
स्रोत : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय














































































