Last Updated on 27 Jan 2022 7:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आयसीएआर-सीसीएआरआयने केले होते नामनिर्देशित
नवी दिल्ली ।
कर्नाटकच्या किनारी दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या अद्यनाडका गावातले कल्पक शेतकरी अमाई महालिंग नाईक यांना भारत सरकारच्या पद्मश्री 2022 ने सन्मानित करण्यात आले. डोंगर उतारावरच्या कोरड्या जमिनीचे कल्पकतेने झिरो एनर्जी अर्थात शून्य उर्जा सूक्ष्म सिंचन प्रणालीच्या माध्यमातून सुपीक शेतात रुपांतर केल्याच्या त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
अमाई महालिंग नाईक यांनी, आपल्या शेतात पाणी आणण्यासाठी, एकहाती 315 फुट लांबीचे सहा बोगदे खणले. पाणी पाझरण्यासाठी त्यांनी शेताभोवती 300 चर खणले. त्यासाठी त्यांनी सुमारे 5000 मोठे लॅटराइट दगडही त्यांनी स्वतःच वाहून आणले. त्यांनी दोन संरक्षक बांध ( 15 फुट लांब,30 फुट रुंद आणि 5 फुट उंच )आणि 12,000 लिटर क्षमतेचा हौदही बांधला. 300 पोफळी, 75 माड,150 काजूची झाडे,केळीची 200 रोपे आणि मिरीचे वेल यांची लागवड करत त्यांनी ओसाड जमिनीचे नंदनवन केले. याशिवाय त्यांनी मधु मक्षिका पालन केले आणि गायींना पोषक आहार म्हणून अझोला निर्माण केला. स्व बळावर केलेल्या या प्रयत्नाने त्यांनी ‘एकांडा शिलेदार’ आणि ‘टनेल मॅन’ म्हणून नाव लौकिक प्राप्त केला. नाईक यांचे शेत म्हणजे प्रत्येकाने आवर्जून पाहावे असे आदर्श शेत ठरले असून वर्षाला, परदेशी पर्यटकासह 1000 पेक्षा जास्त जणांनी इथे भेट दिली आहे.
आयसीएआर-सीसीएआरआय म्हणजे भारतीय कृषी संशोधन संस्था- केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था,गोवा यांच्या संचालकानी, दोन संशोधकांचा समावेश असलेले एक पथक स्थापन केले. या पथकाने या शेतकऱ्याची भेट घेऊन, उत्तम दर्जाच्या छायाचित्राद्वारे त्याच्या तंत्रज्ञानाचे दस्तावेजीकरण करत पद्म पुरस्कार 2022 साठी त्याचे नामनिर्देशन करणारा अर्ज तयार केला.

पद्मश्री मिळाल्याची बातमी ऐकताच,आपले कठोर परिश्रम आणि कल्पकता यांची दखल घेतल्याबद्दल त्यांनी आयसीएआर-सीसीएआरआय गोवा आणि भारत सरकार यांचे आभार मानले.
साभार : पत्र सूचना कार्यालय,भारत सरकार










































































