Last Updated on 03 Mar 2026 4:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहा.कामगार आयुक्त पल्लवी सहारे, तसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, “ एसटी महामंडळाची २५१ आगारे आणि ६१० पेक्षा अधिक लहान-मोठी बसस्थानके राज्यभर आहेत. सुमारे १२ हजार बसेसच्या ताफ्याद्वारे दररोज ५० ते ५५ लाख प्रवाशांची ने-आण केली जाते. भविष्यात बससंख्या वाढल्यानंतर ही दैनंदिन प्रवासी संख्या १ कोटींपर्यंत जाईल. अशा व्यापक पोहोच असलेल्या माध्यमावर जाहिरात देणे म्हणजे उत्पादकांसाठी सुवर्णसंधीच आहे.”
चांद्यापासून बांद्यापर्यंत, गावखेड्यांपासून महानगरांपर्यंत पोहोचणाऱ्या एसटीच्या प्रत्येक चाकासोबत आता महसुलाची नवी चक्रेही फिरणार आहेत. बसस्थानके, त्यांचा परिसर, बसेसच्या आतील व बाहेरील भाग तसेच उपलब्ध सर्व संसाधनांचा पुरेपुर वापर करून जाहिरात महसूल वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, पुढील पाच वर्षांसाठी २५० कोटी रुपयांहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत कार्यरत असलेले जाहिरात परवानाधारकांचा परवाना कालावधी समाप्त झाल्यानंतर जाहिरातीचे अधिकार नवीन परवानाधारकांकडे जाणार आहेत.
सध्या जाहिरातींद्वारे दरवर्षी सुमारे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नव्या निविदेमुळे या उत्पन्नात तब्बल दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे. अशाप्रकारे “तिकीट विक्रीव्यतिरिक्त विविध पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न निर्माण झाले, तर एसटीला भविष्यात तोट्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येणार नाही,” असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.












































































