Last Updated on 11 Mar 2026 6:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली माहिती
मुंबई ।
राज्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत १४ प्रकरणांमध्ये मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारची भूमिका या प्रकरणात पूर्णपणे ‘झिरो टॉलरन्स’ची असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य सतेज पाटील, अनिल परब, प्रविण दरेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, अंमली पदार्थाच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने अँटी-नार्कीटिक टास्क फोर्स स्थापन केला आहे. या टास्क फोर्सचे मुख्य काम अंमली पदार्थ विरोधात कारवाई करणे आणि त्यामागील संपूर्ण साखळी शोधून काढणे असेल. अंमली पदार्थ रॅकेटमधील मुख्य आरोपींसह त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. अंमली पदार्थाच्या पुरवठा साखळीवरही कठोर कारवाई केली जात असून रॉ मटेरियल पुरवठा करणाऱ्यांवरही मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात उघडकीस आलेल्या अंमली पदार्थ प्रकरणात ११ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात कठोर कारवाई सुरू आहे. काही ठिकाणी बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये किंवा ग्रामीण भागातील शेडमध्ये लपूनछपून अंमली पदार्थ तयार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलीस आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अशा ठिकाणांवर तपास सुरू केला आहे. ग्रामीण भागातही पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.












































































