Last Updated on 06 Jan 2026 6:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उरूण ईश्वरपूर नगरपालिकेत अनोखा पदग्रहण सोहळा
ईश्वरपूर नूतन नगराध्यक्षांचा वेगळा ठसा, पदग्रहणाच्या सोहळ्यातच ११ दिव्यांग व्यक्तींना स्वयंचलित सायकलींचे वाटप
दिव्यांगांचा आणि सफाई कामगार महिलांचा सन्मान
ईश्वरपूर/विनोद मोहिते
राजकारणातील विजयाचा जल्लोष अनेकदा दिसतो; मात्र ईश्वरपूर नगरपालिकेत सोमवारी साजरा झालेला हा सोहळा केवळ सत्तेचा नव्हे, तर माणुसकीचा, सामाजिक बांधिलकीचा आणि संवेदनशील नेतृत्वाचा साक्षीदार ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी पदभार स्वीकारतानाच आपल्या कृतीतून ‘सत्ता नव्हे, सेवा’ ही भूमिका ठामपणे मांडली.
तुतारी, ढोल-ताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि हजारो कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्या जल्लोषात एक क्षण असा आला की उपस्थितांचे डोळे पाणावले. पदग्रहणाच्या सोहळ्यातच ११ दिव्यांग व्यक्तींना स्वयंचलित सायकलींचे वाटप करत आनंदराव मलगुंडे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात माणुसकीच्या पायावर केली.
“नगराध्यक्षपद ही खुर्ची नसून जबाबदारी आहे,” हे शब्द कृतीतून दाखवत त्यांनी श्री.आनंदराव मलगुंडे फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांगांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा नवा प्रकाश आणला. चालण्याच्या प्रत्येक पावलात संघर्ष असलेल्या या व्यक्तींसाठी ही सायकल केवळ साधन नव्हे, तर नव्या आयुष्याची चावी ठरली.
याच वेळी वर्षानुवर्षे शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगार महिलांचा सन्मान करत साड्यांचे वाटप करण्यात आले. रोज पहाटे शहरासाठी झटणाऱ्या या हातांना दिलेला हा मान उपस्थितांच्या मनाला भिडून गेला.
माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. “ईश्वरपूरने केवळ नगराध्यक्ष निवडले नाहीत, तर संवेदनशील नेतृत्व निवडले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
फुलांनी सजलेले नगरपालिका आवार, रांगोळ्यांनी नटलेले प्रवेशद्वार आणि फुलांची उधळण — हे सारे दृश्य भव्य होते; पण त्याहून भव्य ठरली सामाजिक जाणीव जपणारी सुरुवात.
ईश्वरपूरच्या राजकारणात हा दिवस केवळ पदग्रहणाचा नव्हता, तर ‘सत्तेपेक्षा सेवा मोठी’ हे दाखवणारा ऐतिहासिक क्षण म्हणून नोंदला गेला.
आणि तो भारावला..!
श्री.आनंदराव मलगुंडे फाउंडेशनच्या माध्यमातून नगराध्यक्ष यांचे नातू रणवीर व राजवीर अमित मलगुंडे यांच्या पुढाकाराने ११ दिव्यांग
व्यक्तींना पाच लाख रुपये किमतीच्या स्वयंचलित सायकली आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.
यशवंत हायस्कूल मध्ये दहावी इयत्तेत शिकणारा विवेक विनोद गावडे म्हणाला,” मी जन्मताच अपंग आहे. परिस्थिती नाजूक आहे. वडील गवंडीकाम करतात. शिकण्याची उमेद आहे. शिवनगर परिसरात वास्तव्यास आहे. स्वयंचलीत सायकल मिळाल्याने माझ्या आयुष्यात गती येईल. या पूर्वी मी व्हील चेअर वापरत होतो. तेव्हा खूप त्रास होत होता. नवे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी दिलेली अमूल्य भेट आहे.
सामाजिक जाणीवेचा आदर्श..!
नगरपालिकेच्या निकालापूर्वीच नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे सुपुत्र अमित यांनी विजयोत्सवासाठी पैसे उधळण्याऐवजी दिव्यांग व्यक्तींना सायकल वाटप करणार असल्याची जाहीर भूमिका घेतली होती. निकालाच्या दिवशी मुख्य चौकात गुलालाची उधळण झाल्यानंतर ताबडतोब स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव ठेवत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांवर पाणी मारून स्वच्छता करण्यात आली.
जल्लोषाला सामाजिक बांधिलकीची जोड देत सुसंस्कृत व जबाबदार राजकीय संस्कृतीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.













































































