Last Updated on 28 Feb 2026 6:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कॅमेरे, सेन्सर्स आणि सायरन प्रणालीने गावकऱ्यांना तत्काळ इशारा
मुंबई ।
वाढत्या मानव–वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची प्रणाली कार्यान्वित केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित कॅमेरे, सेन्सर्स आणि सॅटेलाईट प्रणालीच्या सहाय्याने संवेदनशील भागांमध्ये सतत निरीक्षण केले जात असल्याचे, वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अभिजीत वंजारी, परिणय फुके, शशिकांत शिंदे, भाई जगताप, शिवाजीराव गर्जे, सदाभाऊ खोत, सतेज पाटील, अनिल परब यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
वन मंत्री गणेश नाईक म्हणाले, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. एखादा वन्यप्राणी वस्तीभागात आल्यास कॅमेऱ्यांद्वारे त्याची नोंद होते, सायरन वाजवून सुमारे एक किलोमीटर परिसरातील नागरिकांना सतर्क केले जाते. फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती दिली जाते. या यंत्रणेमुळे संघर्ष टाळण्यास मदत होणार आहे. हिंस्र प्राणी वस्तीभागात येऊ नयेत यासाठी अभयारण्यात त्यांच्या शिकार प्रजाती वाढविणे, फळझाडांची लागवड करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. पुढील दोन–तीन वर्षांत त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यटनाला चालना देण्यासाठी व्याघ्र सफारी तसेच विविध भागांत बिबट सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संबंधित विभागांना जागा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बिबट सफारी प्राधान्याने सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे वन्यजीवांचे संरक्षण होईल आणि मानव–प्राणी संघर्ष कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे व अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक घेण्यात आली. नगर जिल्ह्यात दोन ठिकाणी बिबट हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्र “जीव अमूल्य आहे; नुकसानभरपाईपेक्षा अशा घटना टाळणे महत्त्वाचे,” असे नाईक यांनी सांगितले.












































































