Last Updated on 04 Mar 2026 6:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
कराड ।
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यासारख्या महापुरुषांनी प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन केले. या महापुरुषांचे काही गुण जरी आपल्या अंगी घेऊ शकलो, तर निश्चितपणे आपल्याला यश मिळेल असे प्रतिपादन साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते.
व्यासपीठावर कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, जि. प. सदस्या प्रियांका साळुंखे, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, पं. स. सदस्य मनोज पाटील, सरपंच हणमंत सूर्यवंशी, उदय साळुंखे, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, डॉ. इंदिरा घनमोडे, निमंत्रक प्रीती जगदाळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संतोष पाटील पुढे म्हणाले, आपल्या क्षमता सर्वांत जास्त आई-वडील, गुरुजन आणि स्वतःलाच ठाऊक असतात. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आहे. परंतु एक दिवस आनंदाचा येऊन चालणार नाही, अनेक दिवस आनंदाचे यायला पाहिजेत. येत्या काळात निश्चितपणे विद्यार्थी या महाविद्यालयाचेच नव्हे, या संस्थेचेही नाव उज्ज्वल करणार आहेत.
अध्यक्षीय भाषणात बोलताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून आपले करिअर बनवावे. त्याचबरोबर कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधन करून शेतकर्यांच्या प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा. भागातील मुलांना कृषी तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. आज सर्व सुविधा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून देण्यात येत आहेत.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा प्रकारांमध्ये, विद्यापीठ स्तरावर विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिक ‘स्पंदन’चे अनावरण मान्यवरांचे हस्ते करणेत आले. कु. सानिका चव्हाण हिने क्रीडा स्पर्धा अहवाल व कु. पल्लवी पाटील हिने विद्यार्थी परिषद अहवाल सादर केले.
प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अजित पवार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. सारंग कुंभार यांनी आभार मानले. प्रा. जी. के. मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थिनीचा विशेष सत्कार
कृषी कॉलेजच्या एका २० वर्षीय विद्यार्थीनीने तिच्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी यकृत दान करून वडिलांचे प्राण वाचविले. आणि तिने समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला. याबद्दल तिचा विशेष सत्कार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.














































































