Last Updated on 28 Feb 2026 5:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती
मुंबई ।
बायोटिक ग्रेडेबल नसलेले कुठलेही साहित्य वापरून तयार केलेली कृत्रिम फुले वापरण्यावर बंदी आहे. या निर्णयाला अधिक स्पष्टता देण्यासाठी शासन निर्णय काढला जाईल. तसेच, अशा कृत्रिम फुलांचा वापर करणारे डेकोरेटर्स आणि अशा फुलांचा वापर करून सजावट करणारे मोठे मॅरेज हॉल्स यांच्यावरील कारवाईचा समावेशही या शासन निर्णयात करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कृत्रिम फुले व प्लास्टिकच्या वस्तूंच्या उत्पादन, विक्री व वापरासंदर्भात विधानसभेत सदस्य विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या लक्षवेधीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, प्रविण दटके यांनी सहभाग घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा कृत्रिम फुलांमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे आणि नैसर्गिक फुलांची मागणी घटल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होते. त्यामुळे पर्यावरण विभाग आवश्यक ती कठोर पावले उचलेल. गरज पडल्यास इतर विभागांनाही या कारवाईत सहभागी करण्यात येईल.
मुंबईतील दादर फूल मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. काही ठिकाणी अतिक्रमण कारवाई दरम्यान गैरसमज झाला असावा. फूल मार्केट व्यवस्थित सुरू राहील यासाठी महानगरपालिकेला याबाबत तातडीने आदेश दिले जातील. राज्यातील पर्यावरण संवर्धन, स्थानिक फूल उत्पादकांचे हित आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन या सर्वांचा विचार करून हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर देताना सांगितले की, राज्यात बायोडिग्रेडेबल नसलेल्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी लागू आहे. कृत्रिम फुलांमध्ये वापरले जाणारे केमिकल्स मानवी आरोग्यास हानिकारक असल्यास त्यांच्या विरोधात निश्चित कारवाई होईल. आतापर्यंत ४१३५ टन प्लास्टिक कचरा जप्त करण्यात आला असून, सुमारे २५ कोटी रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले आहेत. तसेच ९२ हजार ठिकाणी नियमभंगाच्या घटना आढळल्या असून, दोषींवर दंडात्मक आणि शिक्षेची कारवाई करण्यात आली आहे.
प्लास्टिक आणि थर्मोकॉलच्या वस्तूंवर राज्यभर बंदी असून, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. लग्नसमारंभ, सण, आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पर्यावरणपूरक सजावट, पुनर्वापरयोग्य साहित्य आणि नैसर्गिक फुलांच्या वापरास प्रोत्साहित केले जाईल. राज्य शासनाकडून लवकरच या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना व अंमलबजावणी यंत्रणा जाहीर केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच होळी सणाच्या अनुषंगाने देखील पर्यावरणपूरक रंग वापरण्याबाबत पर्यावरण विभागामार्फत जनजागृती केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.












































































