शांत,संयम साधेपणाला जे आपल्या जीवनाचे अलंकार मानतात,कर्तव्य परायणता ज्यांच्या जीवनाचा मुलमंत्र असतो,अशी माणसं मातीशी कधीच प्रतारणा करीत नाहीत.त्याच मातीशी नातं सांगणाऱ्या माणसांविषयी ममत्व,आदरभाव आणि आपलेपणाचा भाव त्यांच्या देहबोलीतून सतत पाझरत असतो,आणि हाच पाझर, कर्मयोगाच्या मातीने पसरलेल्या आच्छादनावर पेरलेल्या जबाबदारीची बीजे रूजवून कर्तृत्वाचा मळा फुलवतो,मातीशी इमान सांगणाऱ्या अशाच एका पोलीस अधिक्षकांच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्थेचा आलेख सतत सकारात्मकतेच्या दिशेन चढत आहे,त्या आयपीएस सचिन पाटील यांच्या वर्षभरातील कार्यप्रणालीचा हा धावता आढावा…
जनतेचा पोलीसांवर असलेला विश्वास हा कपाळावर पडणाऱ्या आठ्यांसारखा असतो. या आठयामध्ये दडलेला मतितार्थ उमजला तर त्यामागच्या भावनाही उमजतात आणि मग वर्दीची जबाबदारी समाजाच्या आशा आकांक्षांशी समरस होऊन जातात. गेल्या जवळपास सव्वा वर्षात खाकीविषयी जनमानसात निर्माण झालेला विश्वास ही समरसता खऱ्या अर्थाने अधोरेखित करून गेला. या कालावधीत ग्रामीण भागात पोलिसाविषयी असलेली पारंपारिक तिरस्कारयुक्त भीती दूर होऊन आदर निर्माण झाला. जिथे आदर तिथे भीती आपोआप येते. भीतीतही एक वेगळा जिव्हाळा निर्माण होतो. अन्याय होणार नाही हा नवा विश्वास जन्माला येतो. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची ही कमाई जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेला सन्मान देऊन गेलाच, पण वर्दी मागचा खरा माणूस या काळात जिल्ह्याने अनुभवला.
गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांना दंडीत करणे हे पोलिसांचे कामच आहे. त्यासंदर्भात पत्रकारितेने कौतुक करावे असे काही नाही तरीही आजवरचा जो अनुभव आहे त्या अनुभवाला थेट तडा देण्याचे सकारात्मक काम पोलिस अधीक्षक म्हणून सचिन पाटील यांनी उभे केले म्हणून जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्यस्तरीय माध्यमांना नाशिक जिल्ह्याच्या पोलिस दलाच्या कामाची दखल घेण्याचा मोह टाळता आला नाही. यशस्वी व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे काहीच करीत नाहीत तर कार्य पद्धती इतरांपेक्षा वेगळी असते हे सचिन पाटील यांनी या कार्यकाळात दाखवून दिले. जिल्हा तोच, गुन्हेगार प्रवृत्ती आणि त्यांची गुन्हेशैलीही एकच, तरीही या आधीचा तपासाचा आलेख आणि या वर्ष सव्वा वर्षातील तपासाची आकडेवारी यात दिसणारी तफावतच सचिन पाटील यांच्या कार्यशैलीचे वेगळेपण अधोरेखित होते.
जिल्ह्यात या आधीही अवैध मद्य तस्करी होत होती. कधी तरी कुठे तरी अमावस्या पौर्णिमेला एखादा छापा पडत आम्हा माध्यम कर्मिंसाठी मोठी बातमी देऊन जायचा. इगतपुरीचे वातावरण तर मुबंईकर अय्याश शौकीनांचे माहेर घर बनले होते. गोवंशाची तस्करी आणि या तस्करीच्या जोरावर जिल्ह्याच्या विविध भागात रक्ताळलेले कत्तल खाने जिल्ह्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक प्रतिमेला डागाळीत होते. सप्टेंबर 2020 नंतर सचिन पाटील यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आणि आम्हा माध्यम कर्मीना एका पाठोपाठ एक ब्रेकिंग मिळू लागल्या. अवैध गुटका असो की मद्य, पूर्वी अन्न प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर पोलिस जागे व्हायचे, अलीकडच्या काळात पोलिस अधीक्षकांनी या बेकायदेशीर मंडळीसोबत अन्न आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची झोप उडवली आहे.
सचिन पाटील यांनी पदभार स्विकारल्या दिवसापासून कामाला सुरुवात करून छोट्या मोठ्या अनेक कारवाया केल्या.छापा टाकून थांबवलेल्या रेव्ह पार्टी, शेतकऱ्यांना ठगविलेल्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या बांधणे, रस्ता दरोडेखोरी, घरफोडी आणि त्या अनुषंगाने झालेल्या खु्नांची उकल,असामाजिक तत्वाना वेसण घालून हाताळलेली कायदा सुव्यवस्था एक ना अनेक उदाहरणे आहेत.
प्राधान्याने उल्लेख करावा लागेल अशा कारवायांमध्ये इगतपुरी येथील चंदेरी दुनियेतील मॉडेल फेम रेव्ह पार्टीवर छापा टाकून धन दांडग्याच्या दिवट्यांना दाखवलेला कायद्याचा हिसका, आमदार बंधुच्या बेकायदेशीर बायोडिझेल पंपासह जिल्ह्यात अवैध बायोडिझेल विक्रेत्यांच्या मुसक्या बांधून भारतीय अर्थव्यवस्थेला पोखरण्याचे षडयंत्र हाणून पाडणे, या सारख्या कारवायाचा उल्लेख अनिवार्य ठरतो.
पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केलेल्या कारवाईत चांदोरी येथील बनावट दारू निर्मितीचा कारखाना नेस्तनाबूत करणे महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासात नोंद घेणारी ठरली.सचिन पाटील यांच्या कार्यशैलीचा धांडोळा घेतांना बळीराजाच्या पदरात पोलीस अधीक्षक म्हणूनच नव्हे तर एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून टाकलेले दान विसरता येणार नाही. शेतकऱ्याकडून नगदी पिकांची उधारीत खरेदी करून पैसे बुडवीणाऱ्या ठग व्यापाऱ्यांना शिकवलेला धडा नाशिककर कायम स्मरणात ठेवतील. अजूनही त्यांचे समाधान झालेले दिसत नाही कायदा सुव्यवस्थेला नियंत्रणात ठेवत असतानाच समाजाच्या घामाला फसवून कष्टकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या गोचडी प्रवृत्तीना ठेचल्याशिवाय स्वस्थ बसणार अशी प्रतिज्ञाच सचिन पाटील यांनी केल्याचे दिसते.या संदर्भात ताजे उदाहरण द्यायचे झाले तर पेठ कृषी विभागात तब्बल सहा वर्ष मनमानी करून गरीब शेतकऱ्यांना फसवीणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांच्या मुसक्या बांधल्यानंतर त्याचा तपास स्वतःकडे ठेवणे त्यासोबत शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंद राहावी म्हणून गाव पातळीवर त्यांची कुंडली जमा करण्याची जबाबदारी पोलिस पाटील यांच्यावर देण्याचा त्यांचा निर्णय पोलीस अधिकारी असले तरी शेतकरी पुत्र असल्याचे निर्देशीत करते.
धन दौलत मान सन्मान प्रतिष्ठा देणाऱ्या मातीशी इमान ठेवले तर हे सारे आपसूक घडत जाते,जबाबदारी आणि त्यातून कर्तव्य पार पाडण्याची जागलेली उर्मी हे सारे घडवून आणते.हेच वेगळ्या शब्दात सांगायचे म्हटले तर,आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे,हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.जिल्हा पोलीस दलाला मिळालेल्या याच आत्मविश्वासाने कायदा सुव्यवस्थेच्या अवकाशाला घेरलेल्या कर्तव्यच्यूत काळ्या नभांच्या किर्र अंधाराला चिरत वाट काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवणारे सचिन पाटील म्हणूनच जिल्ह्याच्या गळ्यातील ताईत ठरले आहेत.
एक वर्षभरापुर्वी पोलीस अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून हा लेख वाचत असल्याच्या क्षणापर्यंत नजरेसमोर येणाऱ्या विविध प्रकरणांमधून जिल्हा पोलीस दलाची कार्यक्षमता वाढत असल्याचे लक्षात येईल.
कुमार कडलग
संपादक,लोक राजकारण
धमन्यांमध्ये शेतकऱ्याचे रक्त सळसळत असल्याने जिथेजिथे बळीराजाच्या भावानांना दंश केला जातो त्यात्या सापांना ठेचण्याचा प्रयत्न पो.अधिक्षक सचिन पाटील यांनी जाणीवपुर्वक केला.व्यापाऱ्यानी बुडवलेली कष्टाची कमाई परत मिळवून तर दिलीच,पण शेतकरी धर्मात मातेचा दर्जा असलेल्या गोमातेच्या संरक्षणासाठी कठोर पाउले ऊचलली.जिल्ह्यातून होणारी गोवंशाची तस्करी आणि अवैध कत्तलखान्यांवर कायद्याचा बुलडोझर फिरवला.ग्रामिण पोलीस दलाच्या अखत्यारीतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून होणारी गोवंशाची तस्करी रोखण्यासाठी उपाय योजना केल्या.गोवंश तस्करीची नाकेबंदी करीत असतानाच अवैध कत्तलखान्याचा शोध लागला.आणि एका रात्री अचानक या कत्तलखान्यावर छापा घातला.होय! तोच तो ओझरचा कत्तलखाना.गोवंशाची शेकडो जनावरे या छापामारीतून मुक्त केले.
मालेगावची बायोडिझेल पंपावर केलेली कारावाई देखील एका वेगळ्या अर्थाने महत्वाची ठरली,राजकीय पक्षाची झुल अंगावर पडली की कुठलाही धंदा सुरक्षीत होतो,या गोड समजातून मालेगावमध्ये एका राजकीय नेत्याच्या भावाने मांडलेला बायोडिझेलचा अवैध व्यापार उध्वस्त करतांना राजकीय दबाव येऊ शकतो याची जाणीवही पोलीस अधिक्षकांना या कारावाईपासून परावृत्त करू शकली नाही.पोलीस अधिकाऱ्याला अशीच जिगर हवी असते, मात्र ही जीगर सांभाळतांना होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याचीही तयारी ठेवावी लागते,याचा अनुभव नाशिकच्या पोलीस अधिक्षकांनाही आला.तरीही कर्तव्याशी प्रतारणा करायाची नाही,कर्मातच राम असतो ही भावना एव्हढे धाडस देऊन गेले.
वर्षभरातील महत्वाच्या प्रकरणात आणखी एका गुन्ह्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल,ते प्रकरण आहे ऑनलाईन जुगारचे.जिल्ह्यात काही ठिकाणी रोलेट तर काही ठिकाणी बिंगो नावाने ओळखला जाणारा हा ऑनलाईन जुगार चांगलाच फोफावला होता,या जुगाराचा बादशहा म्हणून नावारूपाला आलेला शहा याची शहर आणि ग्रामिण पोलीसांत असलेली उठबस या जुगाराचे पाळेमुळे घट्ट रूजण्यास चांगली मदत झाली होती.या जुगाराने अनेक कुटूंब कर्जबाजारी होऊन उध्वस्त झाली आहेत. सावकारांकडून घेतलेली रक्कम या जुगारात घालवून परत देण्यास असमर्थ ठरलेल्या काहींनी आत्महत्या केली तर काहींनी घरदार गावच नव्हे तर राज्यही सोडले.कुणाचा मुलगा,कुणाचा भाऊ,पती जीवानिशी गेला,या पोरक्या झालेल्या कुटूंबाच्या वेदना ना शहर पोलीसांच्या मनाला भावल्या ना ग्रामिण पोलीसांच्या हृदयाला त्या भावनांची स्पंदने जाणवली.शेकडो कुटूंब उध्वस्त करणाऱ्या या भामट्याविरूध्द अनेक गुन्हे दाखल असतानाही शहर पोलीसांनी त्याला अटक करण्याचे धाडस दाखवले नाही.सामान्य माणसांच्या आयुष्याची ही धुळधाण पो.अधिक्षक सचिन पाटील यांना मात्र अस्वस्थ करीत होती.प्रतिक्षा होती एका संधीची.त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि संधी मिळाली.पोलीसांना खिशात घेऊन फिरतो हा अहंकार बाळगणाऱ्या या बादशहाच्याही मुसक्या सचिन पाटील यांनी काही कालावधीतच बांधून अशाही वेगळ्या पोलीसिंगचा प्रत्यय दिला…
अशा या खाकी वर्दीतील या व्यक्तीमत्वाची दखल अवघ्या जिल्ह्याने घेतली.काम करतांना काही चुकाही झाल्या.पहिल्या चुकीतून शिकत पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेऊन नाशिक जिल्हा पोलीस दलाचा गाडा सचिन पाटील कौशल्याने हाकत आहेत,समाजातील नकारात्मक जातकुळीतील एक घटक सोडला तर अवघा समाज सचिन पाटील यांच्या पोलीसिंगवर समाधान व्यक्त करतांना दिसत आहे,अगदी राज्य महिला आयोग सुध्दा.