सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका म्हणजे पुरुषार्थाची,पराक्रमाची,क्रांतीवीरांची भूमी वारणा नदीचे पाणी म्हणजे गवतातून सळसळणाऱ्या नागिनीचे रूप अतिशय धारदार व अवखळ खळाळणारे पाणी हे पाणी पिऊन वाढलेली माणसं धष्टपुष्ट शरीराची,निर्मल मनाची,कशी दिलदार आणि दमदार रगेल तशी रंगेल सुद्धा कुस्ती हा आवडता छंद जोपासणारी, वारणा खोऱ्यात पिकणारी ज्वारी, हावळा,भात,अत्यंत कसदार वाढण्याची दुखते जनावरे म्हणजे शेतकऱ्यांना वरदान असा सकस आहार खाऊन धडधाकट दणकट बनलेली निरोगी माणसं इतरत्र क्वचितच पहावयास मिळतील अशा संपन्न प्रदेशात प्राचार्य पी बी पाटील असे नाव जरी कोणी उच्चारले तरी आपल्या नजरेसमोर एक उंचीपुरी, दाढीधारी,पांढरी कपडे घातलेली व चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे व विचारांचे तेज असलेली प्रभावी व्यक्तिमत्त्वाची एक व्यक्ती नजरेसमोर येते.सामाजिक गरज आणि शिक्षण यांची सांगड कशी घालायची, या प्रश्नाने आज शिक्षण व्यवस्था पछाडलेली आहे. पन्नासच्या दशकात मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीला विरोध करत समाज आणि शिक्षणाची सांगड घालणाऱ्या शिक्षण व्यवस्थेची संकल्पना एका २६ वर्षांच्या तरुणाने मांडली आणि ती प्रत्यक्षातही उतरवली. तो तरुण म्हणजे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील.
प्राचार्य पाटील यांचे कार्य हे फक्त ‘संस्थाचालक’ या बिरुदापुरते कधीच राहिले नाही.मौजे चिकुर्डे गावी पांडुरंग बापूराव पाटील यांचा दिनांक 14 जानेवारी 1932 रोजी शेतकरी कुटुंबात जन्म झाला.
प्राचार्य पी बी पाटील नेमके कोण आहेत हे तसे सांगणे सोपे नाही.सांगली या शांतिनिकेतन संस्थेचे एक प्राचार्य, एक शिक्षक तज्ञ ही त्यांची फार ढोबळ ओळख झाली ती फारच तोकडी किंबहुना एकांगी होईल. प्राचार्य पी बी पाटील हे महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण या क्षेत्रातील एक नामवंत कार्यकर्ते, एक विचारवंत म्हणून ते प्रसिद्ध आहेत.राजकारणातील डावपेच त्यांना फारसे जमलेले दिसत नाही कारण त्यात ते यशस्वी झाले असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले असते. राजकारणी मुख्यमंत्री सारेच असतात पण स्व.यशवंतरावानसारखे,विचारवंत मुख्यमंत्री फार थोडे होतात तो राज्याच्या भाग्याचा तो भाग असतो. प्राचार्य पी बी पाटील तसे विचारवंत मुख्यमंत्री झाले असते. त्यांचे अभ्यासाचे विषय अनेक आहेत राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,इतिहास,शिक्षण,संत साहित्य अशी बरीच मोठी यादी तयार करता येईल. पंचायत राज या विषयावर तर त्यांच्या इतकी अभ्यासु व्यक्ती राष्ट्रीय पातळीवर ही सापडणे अवघड आहे,याशिवाय प्राचार्य पी बी साहेब हे साहित्यिक व कलावंतही आहेत खरे तर त्यांचा मूळ पिंडच मुळी साहित्यिकाचा आणि कलावंताचा आहे.साहित्यिक म्हणजे केवळ कथा-कादंबरीकार नव्हे तर लावणी, पोवाडा पासून विडंबन काव्य पर्यंत अनेक प्रकार लीलया हाताळणारे ते प्रतिभावान साहित्यक होते, हे फार थोड्या लोकांना माहीत आहे त्याहून विशेष म्हणजे अन्य तारुण्यातही साहेबां मधील कलावंताने आपल्या कलापथकतून कोल्हापूर,सांगली,सातारा या भागात आपल्या मर्दानी लाजवाब शाहिरीने धमाल उडवून दिली होती हे त्याहून कमी लोकांना माहीत असेल.
खरे तर आपल्या समाजाची समृद्धी कशावर ठरते?आपल्या समाजातील केवळ उद्योगधंद्याच्या भरभराटीवर समृद्धी मोजली जात नाही. या भौतिक समृद्धी बरोबरच सांस्कृतिक समृद्धी आवश्यक असते आणि ती समृद्धी तुमच्या समाजात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत,साहित्यिक,कलावंत,संशोधक,शास्त्रज्ञ किती आहेत यावर अवलंबून असते. या दृष्टीने विचार करता पाटील हे महाराष्ट्राचे मराठी समाजाची सांस्कृतिक समृद्धी वाढविणारे व्यक्तिमत्त्व होते. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या प्राचार्य यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले व शिक्षणावरील प्रेमापोटी इंग्लंडमध्ये सुद्धा काही काळ व्यतीत केला शिक्षणाच्या निमित्ताने त्यांचा शहरात संबंध आला तरीही त्यांचे लोककलेवरील प्रेम किंचितही कमी झाले नाही.प्राचार्य पी बी पाटील सर यांची महत्त्वाची शैक्षणिक निर्मिती म्हणजे ‘ शांतिनिकेतन लोकविद्यापीठ’ आणि त्याच्या विद्यमाने चालविलेल्या अनेक शिक्षण संस्था आणि शिक्षण व अन्य कलांच्या संदर्भातले अभ्यासक्रम आणि उपक्रम यासाठी त्यांना राजकीय आशीर्वादातून फार मोठी जागेची मालमत्ता उपलब्ध झाली होती.. पी.बी.पाटील यांनी १९५८ मध्ये नवभारत शिक्षण मंडळाची स्थापना करून शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला. या ठिकाणी पारंपरिक शिक्षणाबरोबरच पंचायत राज प्रशिक्षण, लोककला, संगीत यांचे शिक्षण देण्यात येते. विद्यार्थिदशेपासून सेवादलाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आचार्य जावडेकर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर, एम.आर.देसाई, डॉ. जे.पी.नाईक, यशवंतराव चव्हाण, रावसाहेब पटवर्धन, लेफ्ट. जन. एस.पी.पी.थोरात, डॉ. वसंतदादा पाटील यांच्यासोबत सामाजिक कार्याचा वसा त्यांनी अंगीकारला होता. विनोबा भावे व महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नवेगाव ही चळवळ त्यांनी सुरू केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ते संस्थापक सदस्य होते. या शिवाय पंचायत राज मूल्यमापन समितीचे अध्यक्ष होते.
सांगली ठिकाणी पहिले शांती निकेतन महाविद्यालय सुरू करण्यात आले, मग शाळा हायस्कूल, मोठ्या रंगमंच,त्यापुढचे पटांगण, वसतिगृहे,निवासस्थाने असा भव्य विस्तार उभा राहिला.प्राचार्य पी बी पाटलांच्या पूढे हे गुरुदेव टागोरांचे शांतिनिकेतन जे पी नाईक यांची गारगोटी ची संस्था,कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था या प्रकारची प्रतिमाने होती. त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना किमान खर्चिक सोय करावी असेही उद्दिष्ट होते. अत्यंत खडतर परिस्थितीत पी बी पाटील यांनी या संस्थेचा पाया मजबूत केला याच महाविद्यालयातून नामदार आर आर पाटील यांच्यासारखा कर्तुत्ववान विद्यार्थी त्यांनी घडविला राज्यभरातून आणि कर्नाटकाच्या सीमाभागातून गरीब विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येत होते.अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले गरजू लोकांना नोकऱ्या दिल्या एवढे करूनही त्यांनी काँग्रेस पक्षात सक्रिय भूमिका घेतली याचाच परिणाम म्हणून 1972 साले सांगली शहर आणि त्यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठविले तेथे त्यांनी एक प्रभावी आमदार म्हणून स्वतंत्र ठसा उमटविला तरीही त्यांनी राजकीय पटलावर कधीही फारसा रस घेतला नाही अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडी पाहून तर त्यांना राजकारणाचा उबग आल्यानचे त्यांच्याशी चर्चा करताना जाणवत असायचे. विविध भाषांतून त्यांच्या परखड विचारांचे प्रतिबिंब उमटलेले दिसते.त्यांनी मांडलेल्या संकल्पना, सिद्धांत, जाती व्यवस्थेवरील वक्तव्य यांमुळे अनेकदा ते वादग्रस्तही ठरले, मात्र त्या वादांमध्ये अडकून त्यांचे काम कधीही थंडावले नाही. राजकारणामध्येही ते सक्रिय होते. राजकारण आणि समाजकारण यांची सांगड प्राचार्य पाटील यांच्या कार्यातून दिसते.
दैनिक लोकमत दैनिकाने सुरू केलेली जन-गण-मन त्यांची लेखमाला संग्रहय अशी ठरली आहे.’ जगाच्या कल्याणा संताची विभुती ‘या उक्तीप्रमाणे आजच्या काळात गावाची होत असलेली वाताहात पाहून प्राचार्य डॉक्टर पाटील हे अंतर्मुख होत होते त्यांच्या मनात भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत असे शिक्षण राजकारण किंवा अन्य कार्यात मग्न असताना सुद्धा त्यांच्या मनात नवेगाव बाबत विचार मंथन सूरु असें. अलीकडच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात काही राजकीय अपप्रवृत्तींचा शिरकाव केला आहे प्राचार्य साहेबांच्या संस्था मात्र याला अपवाद आहेत याउलट सांगली सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र आणण्याचे व त्यांना सन्मान देण्याचे कार्य करणारी संघटना त्यांनी तेथे बांधली. क्रांती विरांचा गौरव करणारा एक दीपस्तंभ ही या विद्यापीठाच्या आवारात त्यांनी उभारला आहे त्यांच्या शैक्षणिक संकुलाच्या विविध शाखा वस्तीग्रह हे कुल विश्व महाविद्यालय असा विस्तार आहे त्यांच्या शैक्षणिक कार्याचा अमरावती विद्यापीठानेडी. लिट पदवी देऊन गौरव ही केला.
बहुमुखी प्रतिभेचे प्राचार्य पाटील उत्तम वक्ते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत . शिक्षण व्यवस्था, नवे गाव आंदोलन, पंचायत राज व्यवस्था, ग्रामीण विकास, पारंपरिक लोककला हे त्यांच्या विशेष आस्थेचे विषय होते. पंचायत राज संदर्भातील पी. बी. पाटील समितीचा अहवाल महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्यासंदर्भात एवढा महत्त्वाचा आहे की, आणखी ५० वर्षे तो राज्याला दिशादर्शक ठरू शकेल. महाराष्ट्र सरकारने अलीकडे लोकसहभागातून ग्रामविकासाच्या ज्या योजना आणल्या आहेत, त्याची मुळे पी. बी. पाटील यांच्या पंचायत राज अहवालातच आहेत. तसेच त्यांच्या साहित्यामध्ये त्यांचे कालप्रदक्षिणा (काव्यसंग्रह), क्रांतिसागर (कादंबरी), समाज परिवर्तन (वैचारिक लेखसंग्रह), नवेगाव आंदोलन (माहिती पुस्तिका), विचारधन : जन-गन-मन (३ खंड) आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
प्राचार्य पी बी पाटील यांना समर्थपणे साथ देणारी व सर्व शांतिनिकेतन मधील विद्यार्थ्यांना आपलंसं करणाऱ्या स्व. सरोज माई म्हणजेच साहेबांच्या पत्नी होय. त्यांनी घरची जबाबदारी तेवढ्याच तोलामोला ने संभाळली. घरातील लोकांचा राबता, समारंभ विवाह,पाहुणे,शैक्षणिक कार्यक्रम यांचा डोलारा सरोज माई संभाळत त्यामुळेच पी बी पाटील यांच्या हातून लोकाभिमुख कामे झाले. मात्र साहेबांनाची अर्धांगिनी माई सर्वांना सोडून गेल्या. सर्व कुटुंब दुःखात बुडालेले असताना नेहमीप्रमाणे सर्वांना आधार व धीर देत हळुवारपणे सर्वांना या दुःखातून त्यांनीच बाहेर काढले. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इतरांना आपलंसं करणं मदतीचा हात देणे व्यक्तिगत आयुष्यापेक्षा इतरांसाठी आयुष्य खर्च करणे ही बांधिलकी जपणे हा स्वभाव प्राचार्य साहेबांचा होता.. माईंच्या झान्या नंतर त्यांनी शिवशाही ते पेशवाई या पुस्तकाचे लेखन करावयास सुरुवात केले. परंतु हळूहळू त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती त्यांना कॅन्सर झाला. त्या परिस्थितीतूनही संघर्ष करता ते बरे ही झाले,परंतु दिनांक 24 फेब्रुवारी 2014 रोजी त्यांचे निधन झाले.प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका कृतिशील विचारवंताला मुकला.
आयुष्यात असे काही क्षण असे काही टप्पे येतात ज्या ठिकाणी योग्य मार्गदर्शक, योग्य व्यक्ती,आपल्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती, तिची प्रेरणा तिचे आशीर्वाद आयुष्यभर सोबतीला राहतात आणि त्या शिदोरीवर खूप मोठं ध्येय गाठण्याचा ही प्रयत्नही होतो जीवनाला आकार, रंग, रूप येतं आणि एक सुंदर चित्र तयार होतं. अशाच माझ्या जीवनातील अतिशय जिव्हाळ्याच्या व्यक्ती म्हणजे पूजनीय स्व. प्राचार्य पी बी पाटील साहेब आणि स्व. सरोजमाई होत.आज 14 जानेवारी त्यांची 90 वी जयंती बुधगाव मधील सरोज उद्यान येथे साजरी केली जात आहे. प्राचार्य पी बी पाटील यांचे हे विचार चिरकाल असून नवीन पिढीला नक्कीच प्रेरणादायी तसेच विचार करायला लावणारे आहेत. अशा या ज्ञान सागराला त्यांच्या जयंतीनिमित्त हे शब्द वंदना…..!
प्रा.सुषमा विलासराव जाधव-पाटील
इतिहास विभाग
वारणा महाविद्यालय,ऐतवडे खुर्द