कोरोनाचे संकट सबंध देशभर नव्हे तर जगभर पसरले. भारतात सर्वाधिक रुग्ण कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सर्वप्रथम मुंबईत व सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरात आढळले.एकाच कुटुंबातील चार जणांना त्यावेळच्या अतिशय गंभीर,धक्कादायक अशा या आजाराची लागण इस्लामपूरात पोहचल्याचा जबर धक्का सा-या परिसराला बसला.तिथून केवळ सांगली जिल्ह्यात नव्हे तर राज्यात, देशात कडक लॉकडाऊन तथा पूर्णत: संचारबंदी सलग सुरु झाली.ज्यांच्या घरात उदरनिर्वाहाची साधने,अन्नधान्य उपलब्ध होते त्यांची देखील पुढच्या टप्प्यात किराणा माल, भाजीपाला अशा अत्यावश्यक साधनांसाठी उपासमारीची वेळ येण्याइतपत परिस्थिती गंभीर होत गेली. त्याहीपैक्षा गंभीर परिस्थिती ओढवली ती सामान्य व गोरगरीब कुटुंब, कष्टकरी, कामगार, मोलमजुरी करणा-या हजारों कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. त्यादरम्यान जस म्हटलं जात की, एकमेकां सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ॥ या शब्दपंक्ती प्रमाणे इस्लामपूर परिसरात जसं की सहकाराच्या धर्तीवर माणुसकी परस्परांना संकटसमयी धावून येवू लागली.
गरज ही शोधाची जननी
कोरोना महामारीच्या काळात राज्यात सर्वप्रथम इस्लामपूरात कोरोनाचे 26 रुग्ण सापडले. संबंध शहर व परिसर, सारा तालुका या घटनेने हादरुन गेला. त्यानंतर इस्लामपूर शहर सातत्याने लॉकडाऊन करणे प्रशासनसाला भाग पडले. संबंध रस्ते निर्मनुष्य झाले. हा कालावधी साधारणत: मार्च 2020 च्या अखेरीस सुरु झाला. कोरोनाच्या धास्तीने व सतत लॉकडाऊनचा कालावधी वाढू लागला. त्यावेळी सर्व प्रकारच्या प्रशासनातील व्यवस्थे बरोबरच पोलींसाची भुमिका देखील महत्वाची होती. इस्लामपूरातच पश्चिम महाराष्ट्रात प्रथम मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने रस्त्यावरील बंदोबस्त आणि समाजातील शांतता-सुव्यवस्था असा प्रयत्न करताना इस्लामपूर परिसरात पोलीसांच्या पुढाकाराने गरजु लोकांना, ज्यांचा उदरनिर्वाह हातापोटावरचा आहे अशा गरीब, कष्टकरी व मजुरांच्या पोटाचा प्रश्न गंभीर बनू लागला अशा वेळी त्यांना कामासाठी, मजुरीसाठी बाहेर पडता येत नव्हते. काम नाही तर दाम नाही आणि दाम नाही तर अन्न नाही अशा संकटामध्ये सापडलेल्या समाजाच्या एका गरीब-गरजू वर्गासाठी अन्नधान्य तसेच तयार जेवणांची पॅकेटस् पुरविण्याची आवश्यकता निर्माण झाली.
सहकार्य अन् सामाजिक बांधिलकीने जोपासली माणुसकी
या धर्तींवर संकटकाळात बहुजनांचे हित साधण्यासाठी इस्लामपूरात पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी शहरातील तत्कालीन अतिशय कठीण म्हणजे संचारबंदीच्या काळात लोकांना मदतीसाठी धावून जाण्याची वृत्ती जोपासली. त्यांच्या पुढाकारामुळे इस्लामपूर परिसरात उद्योजक, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक, वकील ते अगदी सामान्य मोटर मॅकेनिक इथेपर्यंतच्या समाजातल्या विविध स्तरावरील दानशूर लोकांची एक साखळी बघता बघता साकारली.
एकदा आपले दिलेले अन्नधान्य अथवा रोख रक्कम ही अगदी खूप गरजू, उपेक्षित, कष्टकरी, मोलमजूर यांच्यापर्यंत शिस्तबध्दरित्या पोहचवली जाते; हा विश्वास एकदा निर्माण झाल्यावर पोलीस उपअधिक्षक पिंगळे यांनी तयार केलेल्या ‘माणुसकीचं नातं’ प्रतिष्ठानला अनेक दानशूर लोकांची साथ अन् सहकार्य मिळत गेलं. त्यातूनच मार्च 2020 पासून सप्टेंबर 2021 पर्यंत म्हणजेच सुमारे दीड वर्ष या कालावधीत अनेक उपक्रम एकापाठोपाठ एक ख-या अर्थाने केवळ आणि केवळ सहकाराच्या धर्तीवर यशस्वी होत गेले तेही कोणत्याही सरकारी मदतीशिवाय.
कोरोना काळात गरजुंना सहाय्य
‘माणूसकीचं नातं’ प्रतिष्ठान हा ग्रुप मुळातच कोरोनाच्या काळात गरजूंना सहाय्य करण्याच्या हेतूने स्थापन झाला. वाळवा तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या संकल्पनेतून ग्रुप उदयास आल्यापासून प्रत्येक उपक्रमाला लागणारा निधी उस्फूर्तपणे जमा झाला. व्हाट्सअपच्या ग्रुप वर फक्त 24 तासांसाठी नव्या उपक्रमाची व लाभार्थ्यांपर्यंत हा उपक्रम कसा पोहोचविला जाणार आहे याची माहिती ग्रुप लीडर पिंगळे हे देतात. पोलीस सामाजिक शांतता, सुव्यवस्था, कायद्याची प्रभावी अंमजबजावणी करतानाच, सामाजिक बांधिलकी देखील किती प्रभावीपणे देवू शकतात हे यापरिसराने प्रथमच अनुभवले.
एखाद्या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू होऊन प्रत्येक उपक्रमात आपणास काही रक्कम, काही गरजूंसाठी अन्नधान्य, औषधोपचार साहित्य, शालेय साहित्य अशी मदत द्यावी लागली, ही एक संधी मिळाली असे प्रत्येक सदस्याला वाटत असते, हे एक वेगळेपण या ग्रुपचे ठरले आहे. प्रत्येक सदस्य आपापल्या क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व जपणारा आहे. प्रतिष्ठान सदस्यांकडून आर्थिक-वस्तुस्वरुपात मोठ्या प्रमाणावर मदत जमा झाली ही उल्लेखनीय बाब आहे.
या कोरोनाच्या काळात इस्लामपूर परिसरात माणुसकीच्या नात्याने महत्वाची भूमिका निभावली..27 मार्चला हा उपक्रम सुरू करायचे ठरले अन 28 मार्च 2020 पासून हा उपक्रम सुरू होऊन 2 जून 2020 पर्यंत अखंडपणे 67 दिवस सुरू होता..सकाळी 775 व सायंकाळी 775 असे 1550 फूड पॅकेट्सचे वाटप झाले. याचाच अर्थ जवळपास 1 लाख फूड पॅकेट्स वाटप केले गेले. याबरोबरच जवळपास 2000 अन्नधान्याचे किट्स गरजू लोकांना वाटले आहेत. इस्लामपूर शहर व परिसरात माणुसकीचं नात्याचा झंझावात सर्वांना पाहायला मिळाला. महाराष्ट्र शासनाने कालांतराने सर्व गोष्टी पूर्वपदावर आणण्यासाठी निर्देश दिले आणि परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली त्यामुळेच जेवण वाटप बंद करत गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट्सचे वाटप केले गेले. सुमारे 2000 गरजु कुटुंबाना ग्रुपच्या माध्यमातून महिनाभर पुरेल इतके अन्नधान्याचे कीट उपलब्ध करुन दिले. त्यामध्ये गहू, तांदूळ, गोडेतेल, साखर, चटणी, मसाला, साबण, रवा असे साहित्य कीट मधुन देण्यात आले. अनेक दानशुर सदस्यांनी भाजीपाला, अन्नधान्य सढळ हाताने दिले. साधारणत: या काळात रोख व पुरविेलेल्या अन्नधान्यासह 55 लाखांपैक्षा अधिक रकमेचे साहित्य संकलन करुन गरजू कुटुंबापर्यत पोलांसाच्या निर्भया पथकाच्या माध्यमातून पोहचविता आले.
सहकार्याची साखळी आणि जनसेवा
प्रतिष्ठान माध्यमातून सहकार, सहकार्य या उदांत्त भावनेतून उपक्रमांची व्याप्ती वाढताना समाजाच्या तळागाळापर्यंत म्हणजेच योग्य लाभार्थ्यांपर्यत मदत पोहोचू लागली. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद वाक्य प्रमाण मानून अनेकजण माणूसकीचं नातं या प्रतिष्ठानमध्ये सक्रिय झाले.
शहर परिसरातील अनेक उद्योजक, व्यापारी, वकील, डॉक्टर, तसेच समाजाच्या सामाजिक, राजकीय अशा विविध स्तरांवरील अनेक सन्मानिय व्यक्ती या आमच्या उपक्रमात सहभागी झाल्या. त्यातूनच अन्नदान, अन्नधान्याची कीट वाटप, वाळवा-शिराळा तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, दोन्ही तालुक्यातील वाचनालयातील सर्वाधिक पुस्तके वाचणा-या वाचकांना पुस्तक भेट, आणि कोरोना महामारी वाढत असताना कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत ऑक्सीजन मशीन वाटप (प्राणवायुचा मोफत पुरवठा), तुटपुंजे मानधन असणारे वाळवा तालुक्यातील 383 आशावर्कस् महिला भगिंनीना त्यांची दिवाळी (नोव्हेंबर 2020) गोड जावी म्हणून त्यांना अन्न्धान्यापासून ते आरोग्य पुरक वस्तु असणारे सुमारे 700 रुपयांचे एक कीट अशी 383 कीट गावोगावी जावून वाटण्यात आली.
माणुसकीचा प्राणवायु (ऑक्सीजन कॉन्सस्ट्रेटर मशीनचा मोफत पुरवठा)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना ज्याला गरज आहे असे गरजू लोक ऑक्सिजन मशीन वापरतील अन ऑक्सिजन लेव्हल नियमित झाल्यावर ते मशीन परत आणून देतील, अशी ही संकल्पना राबविण्याचा निर्णय याच प्रतिष्ठानने घेतला.इस्लामपूर शहर व तालुक्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने ऑक्सिजन मशीन घेण्याचा निर्णय झाला. ग्रुपवरील केलेल्या आवाहानानंतर 24 तासात 27 ऑक्सिजन मशिनसाठी सुमारे 7 लाखाच्या पुढे रक्कम लगेच जमा झाली. या मशिनचा वापर गरजूंना होवू लागला. अगदी सप्टेबर 2021 च्या अखेरपर्यत या 27 ऑक्सीजन मशीनपैकी किमान 18 ते 20 मशीन कोरोना रुग्णांच्या सेवेत मोफत दिली जात आहेत. त्या संबधी रुग्णांचे आधारकार्ड, मोबाईल नंबर, डॉक्टरांचे नाव अशा आवश्यक तपशीलाचे सर्व रेकॉर्ड प्रतिष्ठानने ठेवले आहे.
गरजू व गरीब रुग्णांसाठी अर्थसहाय्य म्हणून त्यांची औषधांची बिले भागविणे, कोरोनाग्रस्त कुटूंबाला भोजनाचे डबे देवून त्याची बिले भागविणे असे उपक्रम देखील राबविले.
वाचकांचाही गौरव
वाळवा व शिराळा तालुक्यातील जास्तीत जास्त पुस्तके वाचणार्या वाचकांना पुस्तक भेट देऊन थोडासा गौरव करावा अशी संकल्पना ग्रुपने राबविली. गरीब व कष्टकरी युवा लेखक नवनाथ गोरे यांना ही सहाय्य व्हावे म्हणून त्यांनी लिहिलेली आणि गाजलेली ‘फेसाटी’ ही कादंबरी वाचकांना देण्याचे ठरले. सुमारे 30 हजार रुपये ग्रुप सदस्यांकडून जमा झाले.तालुक्यातील प्रमुख वाचनालयातून जाऊन तेथे सर्वाधिक पुस्तके वाचणार्या वाचकांना बोलावून त्यांचा उचित सन्मान पुस्तक भेट देऊन करण्यात आला. इस्लामपूर तसेच शिराळा तालुक्यातील मोठ्या वाचनालयातून संबंधित वाचकांची यादी पाहून हा उपक्रम राबविला गेला.
गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या
कोरोनाच्या काळात मोलमजुरी कष्टकरी व सामान्य कुटुंबात हाताला काम नाही मिळाले तर दाम नाही, दाम नाही तर आपल्या मुला-बाळांचा शिक्षणाचा खर्च कसा करायचा हा प्रश्न पुढे येईल म्हणून त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी थोडासा आधार म्हणून अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या वयोगटाप्रमाणे वह्या वाटपाचा उपक्रम सुरू झाला. अत्यंत चांगल्या दर्जाच्या वह्या इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 4,6 याप्रमाणे वह्यांचा बंच त्यांच्या शाळेत जाऊन देण्याचा विषय झाला. प्रतिष्ठान सदस्यांकडून आर्थिक व शालेय साहित्य स्वरुपात सुमारे 5 लाखाहून अधिक रक्कम जमा झाली.
वाळवा -शिराळा तालुक्यातील बहुतांश शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचा उपक्रम प्रथमच झाला. काही ठिकाणी कंपास व चांगल्या दर्जाचे पेन देण्यात आले. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकडून आई-वडील नसणारे, उपेक्षित, दुर्लक्षित, निराधार, असाह्य व अतिशय गरजु विद्यार्थ्यांची यादी मागवून वह्या वाटप करण्यात आले. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून त्याच वेळी कोरोना काळात घ्यावयाच्या दक्षता व सुरक्षितता या दृष्टीने प्रबोधन करत मोठ्या शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे शाळांमधून, पालकांमधून व विद्यार्थ्यांमधून भरभरून स्वागत झाले. एक माणुसकीच नातं घरा घरात पोहोचणार निर्माण झालं.
मोफत अभ्यासिका – (गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांसह)
आम्हा घरी धन
शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू
शब्दचि आमुच्या जीवांचे जीव
शब्दे वाटू धन ,जनलोका
संत तुकाराम यांनी म्हटल्याप्रमाणे वाचन रुपी शब्द जन लोकांमध्ये….गरीब गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटून त्यांचे उज्वल असे करिअर करण्यासाठी हे प्रतिष्ठान पुढे आले. शिक्षणाने ज्ञानाच्या कक्षा वाढतात.व्यक्तीमत्वाचा विकास होतो. श्रीमंत घरच्या मुलांना स्पर्धा परीक्षा देताना फारशा अडचणी येत नाहीत परंतु गरीब विद्यार्थ्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागतो.एमपीएससी-यूपीएससी क्लासची 1-2 लाख फी त्यांना देता येत नाही.वाचनालयात किंवा अभ्यासिकेत वर्षाचे 50,000 किंवा महिन्याला किमान 1500 ते 2000 रुपये फी भरणे शक्य होत नाही त्यामुळे अशा परिस्थितीशी सामना करणार्या गोरगरीब विद्यार्थ्यांना अनंत यातनांना सामोरे जावे लागते म्हणून ’माणुसकीचं नातं, प्रतिष्ठान इस्लामपूर’ तर्फे ’माणुसकीचं नातं अभ्यासिका’ सुरू करण्याचा मनोदय अनेक सदस्यांनी व्यक्त केला.
आता इस्लामपूरात 51 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व मुंबई-पुण्यात सुद्धा एमपीएससी-यूपीएससीची जी पुस्तके उपलब्ध होणार नाहीत अशा पुस्तकांची लायब्ररी येथे उभारली आहे. अत्यंत गरजू व गरीब विद्यार्थी जे क्लास व अभ्यासिकेचे पैसे भरू शकत नाही अशा 51 विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांनी फक्त स्वतःचे शरीर व मेंदू घेऊन अभ्यासिकेत यावे,कष्ट करावे अन यशस्वी व्हावे,एवढीच माफक अपेक्षा आहे. ह्या गरीब कुटुंबातील मुले उद्याचे आयएएस-आयपीएस, डीवायएसपी-डेप्युटी कलेक्टर,तहसीलदार,फौजदार होतील यात शंकाच नाही.
राजर्षी शाहू जयंती दिनी सुरु झाली अभ्यासिका
समतेचा पुरस्कार करून बहुजन समाजातील शोषित-वंचित व उपेक्षितांना शिक्षणाची द्वारे खुली करणार्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिवशी म्हणजेच 26 जून 2021 रोजी अभ्यासिका सुरु झाली.
मोफत ओपन जिम
शहर परिसरातील सर्व सामान्य लोकांना शहरातील मध्यवर्ती वस्तीत असणा-या पोलीस परेड मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ओपन जिम तयार करण्याचा मनोदय या प्रतिष्ठानने घेतला त्यानंतर इस्लामपूर जायंटस ग्रुपच्या सहकार्याने पोलीस ठाण्यालगत वयायामाच्या विविध प्रकारच्या मजबूत साधनांची अद्ययावत अशी ओपन जिम येथे साकारली. आजही दररोज सुमारे 300 अबालवृध्द, तरुण, मुली, महिला या जिमचा लाभ घेतात. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे हस्ते या प्रतिष्ठानने पुढाकार घेतलेल्या या ओपन जिमचा लोकार्पण सोहळा झाला.
महारक्तदान शिबीर
1 मे 2021 ’महाराष्ट्र दिन’ हा दिवस माणुसकीचं नातं ह्या परिवाराच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा लागेल. कोरोनाच्या काळात झपाट्याने वाढलेला मृत्यूदर, ठिकठिकाणच्या हॉस्पिटल्समधून रक्ताचा तुटवडा अशी शोकांतिका निर्माण झाली. या कठीण परिस्थितीत माणुसकीचं नातं पुन्हा धावून आलं. प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी या परिसरात इतिहासात प्रथमच एवढे महारक्तदान शिबीर यशस्वी केले. या परिसरात 200-250 बाटल्या रक्त संकलन म्हणजे उच्चांक असायचा पण या प्रतिष्ठानने जोपासलेल्या माणुसकीने 662 बाटल्यांचे रक्तसंकलन केले. चार रक्तपेढ्या त्यासाठी बोलवाव्या लागल्या. युवापिढी, मुलीदेखील मागे राहिल्या नाहीत. इस्लामपुरातील आजअखेरचे विक्रमी रक्तदान नोंदले गेले.
‘माणुसकीचं नातं’ या ग्रुपमध्ये विविध उपक्रम राबविले यासाठी ग्रुपमध्ये सदस्यांनी आर्थिक- वस्तुस्वरुपात मदत केली त्याचा तपशिल
1. फुड पॅकेटस् वाटप – 40 लाख रुपये
2. भाजीपाला, साबण, फळे वाटप – 6 लाख रुपये
3. अन्नधान्य कीट वाटप – 10 लाख रुपये
4. शैक्षणिक साहित्य वाटप – 5 लाख 60 हजार
5. पुस्तक वाटप – 30 हजार,
6. जन्मांध भावंडांसाठी/कुटूंबासाठी तयार स्नानगृह-30 हजार रुपये
7. ऑक्सीजन मशीन, उपक्रम – 7 लाख 50 हजार
8. गरजू कोरोना रुग्णांना तातडीची आर्थिक मदत – 2.5 लाख
9. गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका – 6 लाख रुपये
10. मोफत ओपन जिम – साहित्यांसह सुमारे 5 लाख रुपये
अशा एकूण विविध उपक्रमांतून सुमारे 85 लाखाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आणि रोख व वस्तु स्वरुपात मदत झाली आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सढळ हाताने संकटकालीन परिस्थितीच्या औचित्याने सहदयी भावनेने अर्थसहाय्या बरोबरच तांदूळ, गहू, गोडेतेल, तूप, रवा, साखर, चटणी, डाळ, भाजीपाला, साबण, फळे, कांदा, बटाटा यासह अनेक जीवनाश्यक वस्तुंची भरभरुन मदत केली. त्याचा समावेश वरील रकमेमध्ये आहे. या सा-यांचे वाटप पोलीसांच्या निर्भया पथक गाडी व कर्मचा-यांच्या तसेच सदस्यांच्या सहाय्याने झाले.
फुड पॅकेटस वाटपानंतर महिनाभर पुरेल एवढया अन्नधान्याच्या किटसच्या वाटपाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते इस्लामपूर शहरातील वडर गल्ली परिसरात एकावेळी 100 जणांना महिनाभर पुरेल एवढया किटवाटपाने झाला. पुढच्या टप्यात एकूणच या उपक्रमाची माहिती मिळाल्यावर माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांनी या ग्रुपच्या अॅक्टीव्हीटजची माहिती घेतली आणि पोलिस उपअधिक्षक कार्यालयात ग्रुपच्या प्रमुख सदस्यांचा यथोचित गौरव केला.