Last Updated on 03 Dec 2021 9:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार
मुंबई |
ग्रामीण महिलांच्या बचतगटांना दरमहा किमान 1 लाख रुपयांचे उत्पन्न मिळावे यादृष्टीने ठोस आराखडा तयार करण्यात यावा. इतर राज्यातील आदर्श उदाहरणांचा अभ्यास करून आपल्या जिल्ह्यात प्रयोग करावेत, असे आवाहन ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले.
राज्यभरातील प्रकल्प संचालक आणि उपायुक्त यांच्या दोन दिवसीय निवासी परिषदेत मार्गदर्शन करताना श्री. कुमार बोलत होते.
ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याने आपल्या भागातील सर्व क्षेत्रातील क्षमता तपसाव्यात, त्यांना विपनणासाठी मदत करावी. ऑनलाईन मार्केटिंगचे सर्व व्यासपीठ बचतगटांना उपलब्ध होत आहेत. त्यासाठी पॅकेजिंग, ब्रँडिंग चे बचत गटांना नियमित प्रशिक्षण दिले जाण्याची व्यवस्था करावी, ग्रामीण बचतगटांच्या महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात.
जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर काम करणाऱ्या यंत्रणांनी आणखी जबाबदारीने काम करून उमेद अभियान राष्ट्रीय स्तरावर सर्वात पुढे राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 5 लाखापेक्षा जास्त बचत गटांचे जाळे उभे केल्याबद्दल यंत्रणेचे त्यांनी कौतुकही केले.
यावेळी अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष गृहनिर्माण डॉ राजाराम दिघे, उपसचिव श्री. प्रवीण जैन, उपसचिव पंडित जाधव, अभियानाचे अतिरिक्त संचालक श्री. परमेश्वर राऊत हे उपस्थित होते. अवर सचिव श्री. धनवंत माळी यांनी आभार मानले.










































































