Last Updated on 04 Mar 2026 7:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अफगाणिस्तानमार्गे भारतात येणाऱ्या स्वस्त ‘चायनीज’ बेदाण्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत असून, या प्रकरणात केंद्र सरकारच्या सीमाशुल्क विभागाने काटेकोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचीही त्यांनी शासनाकडे मागणी केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले की, सातारा जिल्ह्यात सन २०२५–२६ या वर्षात सुमारे ५०४ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड करण्यात आली आहे. द्राक्ष हे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून, हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे या पिकाशी संबंधित कोणत्याही धोरणात्मक निर्णयाचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असतो. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ‘साउथ एशियन फ्री ट्रेड एग्रीमेंट’ अंतर्गत करार झाला असून, या करारानुसार अफगाणिस्तानमधून भारतात आयात होणाऱ्या बेदाण्यावर १०० टक्के आयात शुल्क माफ आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधून येणारा बेदाणा भारतात बिनशुल्क येतो. परंतु या सवलतीचा काही व्यापारी गैरफायदा घेत आहेत. तसेच चीनमधून मोठ्या प्रमाणावर बेदाणा अफगाणिस्तानमध्ये पाठवला जातो आणि तोच ‘चायनीज’ बेदाणा अफगाणिस्तानमार्गे भारतात आयात केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रक्रियेमुळे स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर बेदाणा भारतीय बाजारात येत असून, त्यामुळे महाराष्ट्रातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
या पार्श्वभूमीवर सीमाशुल्क विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून अफगाणिस्तानच्या नावाखाली भारतात येणाऱ्या ‘चायनीज’ बेदाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी कडक कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी नमूद केले.
याचबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विविध योजनांमधून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. सध्या कृषी विभागाकडून द्राक्ष लागवडीसाठी सुमारे ३ लाख ९ हजार रुपये, तसेच एकात्मिक फलोत्पादन कार्यक्रम आणि राष्ट्रीय कृषी विकास अभियान या योजनांमधून सुमारे २ लाख ४० हजार रुपये असे मिळून जवळपास ५ लाख ४९ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. मात्र, सध्या द्राक्ष लागवड, देखभाल, मजुरी आणि उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने हे अनुदान अपुरे ठरत असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी सांगितले. त्यामुळे बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून द्राक्ष उत्पादकांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या चर्चेला उत्तर देताना फलोत्पादन मंत्री ना. भरतशेठ गोगावले म्हणाले, की आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी अफगाणिस्तानमार्गे भारतात येणारा ‘चायनीज’ बेदाण्याचा अतिशय गंभीर मुद्दा मांडलेला असून, याबाबत राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारला माहिती देऊन, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कडक पावले उचलली जातील. तसेच द्राक्ष उत्पादकांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.














































































