Last Updated on 28 May 2025 9:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । सांगली जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी, मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन.डी.आर.एफ) एक पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या पथकामध्ये पथक प्रमुख संतोषकुमार तिवारी व इतर 24 जवान आहेत. या पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमारत कोसळल्यानंतर शोध व सुटका कामी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे. मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एन.डी.आर.एफ. पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक मान्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे.
या पथकामार्फत जिल्ह्यामधील संभाव्य पूर प्रवण भागातील क्षेत्र, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावांची पाहणी, धोकादायक औद्योगिक क्षेत्र इत्यादी पाहणी करण्यात येणार आहे. आपत्तीच्या काळात काय करावे व काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे एन.डी.आर.एफ पथकातील अधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात सध्या सुरू अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी मुंबई येथे दोन रायगड ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक एनडीआरएफचे पथक पोहोचले आहे. तर गडचिरोली आणि नांदेड येथे एसडीआरएफचे प्रत्येकी एक पथक पोहोचले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली.
९३ लाख ३३ हजार एसएमएस
सचेत ॲपमार्फत आज २८ मे २०२५ रोजी १७ अलर्ट पाठविण्यात आले आहेत. हे अलर्ट संदेश ९३ लाख ३३ हजार नागरिकांना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.
स्रोत : जि.मा.का., सांगली
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 04 May 2026 3:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit सिसिलिया कार्व्हालो, विवेकानंद गोपाल, सुरेंद्र दरेकर, रणधीर शिंदे, अनंत कदम यांचा समावेश ईश्वरपूर । राज्याचे माजी मंत्र... Read more










































































