बाल विवाह रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकरी अमोल येडगे यांचे निर्देश
कोल्हापूर । अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात बाल विवाह होत असल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून या प्रकरणातील संबंधितांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकरी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
बाल विवाह रोखण्यासाठी गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम, बैठका, रॅली आणि माहितीपत्रके वाटप करण्यात येत आहेत. बाल विवाह करणाऱ्यांवर तसेच बाल विवाहात सहभागी होणारे धार्मिक गुरु, पंडीत, सेवा देणारे मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजत्री यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिला आहे.
गेल्या वर्षभरात महिला व बाल विकास विभागाने 28 बाल विवाह थांबविले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बाल विवाहास प्रतिबंध म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांनी बाल विवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1098 किंवा 112 यावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी केले आहे.