सांगली । बाजार समितीच्या संचालक मंडळाने आदर्शवत चाललेल्या राज्यातील व शेजारील राज्यातील बाजार समित्यांना भेट देऊन त्याचा अभ्यास करावा. आपण उत्पन्नाचे नव-नवे स्रोत निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असा सल्ला माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील समारंभात बोलताना दिला.
इस्लामपूर येथील बाजार समितीच्या इमारत नूतनीकरण व श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील फळे व भाजीपाला मार्केटमधील नवीन व्यापारी गाळ्यांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लोकनेते राजारामबापू पाटील, स्व. विलासराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, राजारामबापू सह.बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजीराव आपुगडे, सचिव विजयकुमार जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले की, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेतील शेती माल आपल्याकडे येईल काय? अशी भिती निर्माण झाली आहे. अमेरिकेत जाणाऱ्या मालावर मोठ्या प्रमाणात कर लावला जात आहे. यामुळे शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी झाल्या आहेत.याचा परिणाम बाजार समितीवर होऊ शकतो. माजी मंत्री शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक आपले आधारस्तंभ आहेत. तालुक्यातील महिला बचत गटाने तयार केलेला माल ठेवण्याची आपल्याकडे व्यवस्था करायला हवी.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, शिराळा व वाळवा बाजार समिती एकच होती. परतू त्यामध्ये इस्लामपूर बाजार समिती व शिराळा बाजार समिती अशा दोन झाल्या आहेत. परतू इस्लामपूर बाजार समितीची प्रगती झाली आहे. हे पाहण्यास आम्हाला आपण बोलविले आहे. आपणच आम्हाला शिराळा बाजार समिती करुन देवून आपला डाव साधला आहे. आम्ही पंचायत समितीचा ठराव करु,आपण आम्हास पूर्ववत इस्लामपूरमध्ये घ्यावे. शिराळा बाजार समितीचे उत्पन्न कमी आहे. बाजार समितीचे सेस वाढविण्याचा निर्णय सरकारने घ्यावा.
माजी आ.मानसिंगराव नाईक म्हणाले, बाजार समिती चालविणे आव्हानात्मक झाले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. इस्लामपूर बाजार समितीने ताकारी व आष्टा येथे व्यवसाय वाढविला आहे. संस्था चांगल्या पध्दतीने चालवून संचालक मंडळाने विश्वस्त म्हणून चांगले काम केले आहे. सांगली जिल्हा बँक आ. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली राज्यात आदर्शवत केली आहे. आपल्या बँकेचा महाराष्ट्र राज्यात ३ रा, ४था क्रमांक आहे.
वैभव शिंदे म्हणाले, स्व.विलासराव शिंदे यांनी आष्टा येथे हळद सोदे चालू केले. आष्टा येथील जागेचा प्रश्न सुटेल व तेथे विलासराव शिंदे उपबाजार समितीच्या गाळ्यांचे उदघाटन केले जाईल. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जास्तीत-जास्त मदत केली जाईल.
प्रारंभी बाजार समितीचे सभापती संदीप पाटील स्वागत व प्रास्ताविक भाषणात बाजार समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप व औषध दूकाने चालू करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, पंचायत समितीचे उपसभापती नेताजीराव पाटील, माजी सभापती पै.आप्पासाहेब कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, संजयबापू पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, डॉ.अशोक पाटील, माजी सभापती अँड.विश्वासराव पाटील, आनंदराव पाटील, दिलीपराव देसाई, माजी उपसभापती सी.व्ही.पाटील, संदीप पाटील, सुभाषराव सुर्यवंशी, कामेरीचे सरपंच रणजित पाटील, मिलींद थोरात, माजी उपसभापती दिलीप कदम, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, अँड संपतराव पाटील, दिग्विजय पाटील, मयूर पाटील, पोपटराव जगताप, शिगावच्या शैलेजा पाटील, शैलेजा जाधव, सुहास पाटील, कारखाना संचालक शैलेश पाटील, अमरसिंह साळुंखे, राजकुमार कांबळे, शंकरराव चव्हाण, रणजित गायकवाड, दिलीप पाटील, नंदकुमार पाटील, ब्रम्हानंद पाटील यांच्यासह बाजार समितीचे संचालक,राजारामबापू उद्योग समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.