Last Updated on 28 Jun 2024 7:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वाळू धोरणामध्ये सुलभता येणार– महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई | राज्यातील जनतेला सहज व स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी शासन वाळू धोरणाची अंमलबजावणी करीत आहे. या धोरणामध्ये अधिक सुलभता आण्यासाठी शासन प्रयत्न करत असून, या धोरणातील बदलाबाबत काही सूचना आल्यास त्यांचा स्वीकार करून धोरणात सुधारणा करण्यात येतील, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य संजय गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात, बबनराव लोणीकर, नाना पटोले, राजेश टोपे, यशोमती ठाकूर यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.
महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, वाळू व्यवसायातून गुन्हेगारीकरणही वाढले. सर्वसामान्य माणसाला होणारा त्रास कमी व्हावा म्हणूनच या सभागृहात चर्चा करुन, सर्वकष असे वाळू धोरण सरकारने आणून त्याची अंमलबजावणी सुरु केली. या धोरणाबाबत अजूनही सर्वांशी संवाद साधून, तज्ज्ञांची चर्चा करुन या धोरणात अधिक सुधारणा करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. मागील पाच ते सहा वर्षांची आकडेवारी पाहिली असता नवीन वाळू धोरणामुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात कुठेही नुकसान झालेले नाही. यामुळे वाळूच्या धोरणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे निर्माण केलेले वातावरण निराधार आल्याचेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
वाळू व्यवसायातील गुन्हेगारीकरण थांबविण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. महसूल आधिकारी, कर्मचा-यांवर होणा-या हल्ल्यांबाबतही जिल्हाधिका-यांना कारवाईचे सर्व अधिकार देण्यात आले असल्याचेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.












































































