मुक्तांगण व क्वेस्ट तर्फे बालशिक्षणावर संवाद
सांगली । घर आणि शाळा यांच्या दरम्यान पालक महत्त्वाचा दुवा आहे. पालकांनी मुलांसाठी जाणीवपूर्वक अर्थपूर्ण वेळ द्यायला हवा.लहान वयात मेंदूचा विकास जलद होत असतो. या काळातच अनुभवावर आधारित बालशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे असे मत बालशिक्षणाचे अभ्यासक व क्वेस्टचे प्रशिक्षक नितीन मराडे यांनी व्यक्त केले.
राज्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) व इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटर तर्फे ” बालशिक्षणातील पालकांची भूमिका ” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. मुक्तांगणचे सचिव विनोद मोहिते अध्यक्षस्थानी होते. क्वेस्टचे
प्राची बोगम,आकाश भोर,सायली तनपुरे, सूरज उर्मिला सुनिल उपस्थित होते.
श्री.नितीन मराडे म्हणाले,” गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांची समज आणि आकलन वाढले पाहिजे. मुलांच्या क्षमता वाढीसाठी पालकत्वाच्या अनुषंगाने साक्षर होणे गरजेचे आहे. शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला ,ती जोपासण्यासाठी पालकांनी संयुक्त प्रयत्न करावेत.बाल शिक्षणातील विविध अनुभवातून मुलांच्या मनात मूल्यांची रुजवण व्हावी. बालवाडीच्या स्तरावर गणिताचे शिक्षण अनुभवाधारित असलं पाहिजे.लहान मुलांना आवडतील अशी पुस्तक त्यांचा सहभाग घेत वाचून दाखवली तर मुलांची लेखी मजकुराची जाण वाढते.”
ते म्हणाले,” लहान मुलांचे अनुभव विश्व मर्यादित असते. शिवाय त्यांचे अवधान फार काळ टिकत नाही. मुलं अगदी जन्मापासून अवतीभवतीचे जग समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मुलांच्या अनुभवाला शिकण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे.गणित आणि भाषा विषयाच्या विकासामध्ये घरच्या वातावरणाचा प्रभाव असतो. बाल शिक्षणात जाताजाता सहज शिक्षण देणे आवश्यक बनले आहे.मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांचे प्रयत्न हवेत.” मुक्तांगणच्या अध्यक्षा सरोजनी मोहिते यांनी आभार मानले.
मुक्तांगणचे उपक्रम राज्याला पथदर्शी..!
अनुभवावर आधारित बालशिक्षण देण्यासाठी मुक्तांगण प्ले स्कूलचे उपक्रम राज्याला पथदर्शी आहेत. खेळातून व अनुभवातून घेतलेल्या उपक्रमांनी मुक्तांगणला राज्यात नवी ओळख निर्माण करून दिली आहे. बालशिक्षणात काम करतांना क्वेस्ट व मुक्तांगण संयुक्तपणे पालकांसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू करीत आहोत.
नितीन मराडे
क्वेस्टचे प्रशिक्षक