पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माळशिरसच्या सभेतून काँग्रेसवर जोरदार टीका
सोलापूर | काँग्रेसचे देशात ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत राज्य होते. पण, त्यांनी सत्ता असताना ही 60 वर्षांत काही केले नाही, ते आपल्या सेवकाने म्हणजेच मोदी सरकारने १० वर्षात करून दाखवले. काँग्रेसचे पंतप्रधान आणि नेत्यांकडून फक्त गरिबी हटविण्याचे नारा देत होते. मात्र, ती हटविण्यासाठी काही करत नव्हते. आम्ही गेली दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. गरिबीतून बाहेर आलेल्या त्या लोकांचे पुण्यही याच मतदारांना जाते. त्यांनी मला सेवा करण्याची संधी दिली. जेव्हा देशात मजबूत सरकार असते, तेव्हा वर्तमान काळाबरोबरच भविष्याकडे लक्ष देता येत असते. त्यामुळे रेल्वे, महामार्ग, इतर पायाभूत सुविधांसाठी काम करण्याची पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मोदी यांची माळशिरस येथे जाहीर सभा झाली.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे, आ. जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.मोदी यांनी डोक्यावर पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन मंचावर प्रवेश करताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला आहे.सभेला महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
इतक्या उन्हात व लांबून आलेल्या महिला व कार्यकर्त्यांची मोदी यांनी दखल घेतली. दहा वर्षात झालेल्या पालखीमार्ग व पंढरपूर तीर्थ क्षेत्र विकासाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. विदर्भ व मराठवाड्याला थेंब थेंब पाण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी तरसावले आहे.काँग्रेसला 60 वर्षे विकासकामाची संधी होती. पण त्यांनी काहीही केलेले नाही. देशात 2014 नंतर खरा विकास सुरू झाला, 26 योजना सुरू केल्या. शेतामध्ये पाणी पोचविण्याचे काम आम्ही केले असे मोदी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्राला गती देण्यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. येत्या काही दिवसात देशात नव्याने बाजार समिती स्थापन करण्यात येणार आहेत, त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच सहकारी तत्त्वावर कोल्ड स्टोअरेज बनविण्यात येणार आहेत, त्याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ही केंद्र शासनाने मोठी मदत केली आहे. पूर्वी प्रतिक्विंटल २०० रुपये एफआरपी मिळत होती, आता ३५० रुपये मिळत असल्याचे मोदी यांनी सांगितले.त्यामुळे शेतकऱ्यांना १ लाख १४ हजार कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. तसेच अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना पून्हा उभारी देण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले असल्याचे ही मोदी यांनी सांगितले. तर राज्यातील बडे राजकीय नेते हे केंद्रीय कृषिमंत्री होते. त्यांना जे शेतकऱ्यांसाठी करता आले नाही ते आम्ही करुन दाखविले असल्याचे मोदी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील एक मोठा नेता 15 वर्षांपूर्वी माढ्यात निवडणूक लढविण्यासाठी आला होता. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी पोचविण्याची शपथ घेतली होती. त्यांनी या ठिकाणी पाणी पोचवले नाही, हे तुमच्या लक्षात असेलच. त्यांना आता शिक्षा देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता उल्लेख केला.
जे लोक वचन पूर्ण करत नाहीत, त्यांचा हिशेबही महाराष्ट्रातील जनता बरोबर करते. त्यांना बरोबर लक्षात ठेवते. त्या मोठ्या नेत्याने माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे धाडस दाखवले नाही.आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा मराठीतून भाषणाची सुरुवात केली. विकासित भारतासाठी मी मत मागायला आलो आहे. मी वेळेत येतो, दूरवरून येणाऱ्या लोकांची गैरसोय होते, त्यामुळे मला क्षमा करा. काही राजकीय नेत्यांनी सभेला उशीरा येण्याची फॅशन केली होती. काही लोक अजूनही येत आहेत, त्यांची मी माफी मागतो. पण, मला पुढील सभेसाठी जायचे असल्याने मी वेळेत आलो आहे, मला माफ करा, या शब्दांत नरेंद्र मोदींनी उशिरा येणाऱ्या लोकांची माफी मागितली.
साभार : प्रसार भरती