आगामी निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग प्रतिबध्द आणि सज्ज- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणुका खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव व्हावा,यासाठी निवडणूक आयोग प्रतिबध्द आणि सज्ज असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी सांगितलं.निवडणुकांच्या आयोजनासाठी निवडणूक आयोगाकडून गेली २ वर्ष सुरु असलेल्या तयारीची माहिती त्यांनी यावेळी दिली तसंच निवडणूका निष्पक्ष, सुरळीतपणे पार पाडाव्यात यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आणि सर्व नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
देशात जवळपास ९७ कोटी मतदार असून प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या १ कोटी ८० लाख आहे तर २० ते २९ या वयोगटातले १९ कोटी ७४ लाख मतदार आहेत. ८५ वर्षांवरील नागरिक आणि ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना मतदान करता यावं यासाठी त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्याची सोय यंदा देशभरात प्रथमच करण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांना १२ डी अर्ज भरावा लागेल. याचसोबत मतदान केंद्रांवरही रॅम्प, व्हीलचेअर,स्त्री -पुरुषांसाठी वेगळं शौचालय, पिण्याचं पाणी अशा सोयी करण्यात येणार आहेत.
लोकसभा निवडणुकांसाठी साडे दहा लाखांहून अधिक मतदान केंद्र आणि ५५ लाख ईव्हीएम वापरली जातील, अशी माहिती कुमार यांनी दिली. देशातल्या महिला मतदारांचं गुणोत्तर वाढून ९४८ झालं असून काही राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक असल्याची बाब कुमार यांनी नमूद केली. निवडणुकांमध्ये हिंसाचार, पैशांचा वापर, अफवा यांना आळा घालण्यासाठी पोलिस आणि अंमलबजावणी संस्थांसोबत काम केलं जाणार असून निवडणुकांवर देखरेखीसाठी ड्रोनचं साहाय्य देखील घेण्यात येईल. हिंसाचार करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई केली जाणार असून संशयास्पद ऑनलाईन व्यवहारांवर लक्ष ठेवलं जाईल. अफवा पसरवणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई केली जाईल असंही कुमार यांनी सांगितलं. निवडणूक आयाेगानं राजकीय पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता जारी केली असून प्रसारमाध्यमांच्या संपादकांसाठीदेखील काही सूचना जारी केल्या आहेत.
लोकसभा निवडणुका सर्वसमावेशक आणि पर्यावरणीयदृष्टया शाश्वत होण्यासाठीही पावलं निवडणूक आयांगाने उचलली असल्याचं कुमार यांनी सांगितलं. तसंच यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत, सी-विजील, केव्हायसी यांसारख्या सुविधा नागरिकांची जागरुकता वाढवण्यासाठी, आयोगानं सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.लोकसभा निवडणुकांच्या घोषणेसोबतच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.