मुंबई | महाराष्ट्र ही संत, कर्तृत्ववानांची भूमी आहे. या भूमीतूनच देशाला अनेक परंपरा आणि सुधारणा देण्याचे काम झाले आहे. राज्य शासनही हाच धागा पकडून महामानवांच्या विचारांनुसार काम करीत आहे. आपले राज्य पायाभूत सोयी सुविधा उभारणी, परकीय गुंतवणूक यामध्ये देशात अव्वल असून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढत देशात व राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आधारित कारभार सुरू असल्याचे प्रतिपादन केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2019-20 ते 2022-23 मधील विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस येथे झाला. या सोहळ्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, ज्ञानेश्वर म्हात्रे, भरत गोगावले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आदी उपस्थित होते.
समाजाच्या शोषित, वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शासन करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, की शासनाने सामाजिक न्याय विभागासाठी सर्वात जास्त 21 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पैशांअभावी शिक्षण सोडावे लागू नये म्हणून शिष्यवृत्ती व शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येतात. शिष्यवृत्तीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करून महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचे भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी देशात आपल्या राज्यात प्रथमच दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात आला आहे. लाड समितीने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या शिफारशी लागू करण्यात येत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगार, प्रशिक्षण व संशोधनासाठी बार्टी संस्था काम करीत आहे. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येत आहे. परदेशातील उच्च शिक्षणासाठीसुद्धा मदत करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या घराचे स्मारकात रूपांतर केले. मुंबईत इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू आहे. राज्यात रमाई आवास योजनेतून साडेचार लाख घरकुल बांधण्यात आली आहेत. शासनाने नागरिकांना योजनांचा लाभ त्यांच्या जवळ जावून देण्याचे ठरविले आणि शासन आपल्या दारी कायर्क्रम राबविण्यात आला. आतापर्यंत 20 कार्यक्रमांमधून 4 कोटी 60 लाख लोकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. हा कार्यक्रम लोकाभिमुख बनला आहे. हे शासन आपत्तीमध्ये धावून जात आपत्तीग्रस्त लोकांचे दु:ख दूर करण्याचे काम करीत आहे.
पुरस्कारार्थींचा सन्मान करण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, मागील चार वर्षाचे प्रलंबित असलेले 393 पुरस्कार आपण देत आहोत. पुरस्कार नवीन काम करण्याची ऊर्जा देतात. पुरस्कार प्राप्त व्यक्तीच्या कामाची प्रेरणा अन्य घेवून चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे समाजाच्या जडण – घडणीत अनुकूल परिणाम दिसून येतो, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांवेळी म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कळवा जि. ठाणे या इमारतीचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात सचिव श्री. भांगे यांनी पुरस्कार व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली.
सामाजिक न्याय विभागाला पर्याप्त निधी देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार
समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा शासनाचा नेहमीच प्रयत्न असतो. समाजातील मागास, वंचित घटकाचे कल्याण करून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासन करीत असते. या समाज घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासाकरिता सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. त्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असते. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाला पर्याप्त निधी देण्याचा नेहमी प्रयत्न असतो, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शासनाने लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात त्यांच्या लाभाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्याला मिळत आहे. राज्यात अनुसूचित जाती घटकाची लोकसंख्या 1.32 कोटी आहे. या समाज घटकाकरिता 13 टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. पुरस्कार महामानवांच्या नावाने देण्यात येत आहे. त्यांना यापुढे महामानवांच्या पुरस्कारार्थी नावाने ओळखण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच पुरस्कारार्थी व्यक्तींची जबाबदारी वाढली आहे.
पुरस्कारांचे मानकरी
या सोहळ्यात वैयक्तिक व संस्था पातळीवर एकूण 393 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यापैकी प्रातिनिधीक स्वरूपात 14 पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार :
वैयक्तिक स्तरावर – बापूसाहेब कांबळे (जि. कोल्हापूर), शिवाजी गवई (जि. जालना), कृष्णाजी नागपुरे (चंद्रपूर).
संस्था स्तरावर- श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण जि. सातारा, पब्लिक वेल्फेअर सोसायटी जि. नागपूर.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार :
वैयक्तिक स्तरावर – पोपटराव साठे (जि. अहमदनगर), रावसाहेब कदम (जि. ठाणे),
संस्था स्तरावर- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण विकास मंडळ छत्रपती संभाजीनगर,
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार :
वैयक्तिक स्तरावर- धोंडीरामसिंह राजपूत छत्रपती संभाजीनगर,
संस्था स्तरावर- क्रांतीसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हाडगा ता. निलंगा जि. लातूर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार :
संस्था स्तरावर – कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सर्वोदय वसतिगृह कासेगाव ता. वाळवा जि. सांगली,
शाहू फुले आंबेडकर पारितोषिक :
संस्था स्तरावर – सतचिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ
संत रविदास पुरस्कार :
वैयक्तिक स्तरावर – श्वेता दाभोळकर ठाणे.
संस्था स्तरावर – शिवकृपा समाज सेवा मंडळ लातूर