संकटे आणि संधी घेऊन आलेली ही लढाई निकराने लढून जिंकायची आहे
सांगली । संकटे आणि संधी एकत्र आल्या आहेत. आता मागे हाटून चालणार नाही. या वेगळ्या लढाईत साम,दाम,दंड,भेदाचा प्रचंड वापर केला जाणार आहे. आपणास निकराने लढून ही लढाई जिंकायची आहे,असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी बोरगाव (ता.वाळवा) येथील समारंभात बोलताना व्यक्त केला. मीही सहज मंत्री झालो असतो. मात्र आपल्या भक्कम पाठबळाने आपण पक्ष व नेतृत्वाशी अखंड निष्ठा ठेवण्याचे धाडस केले असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बोरगाव येथील श्री.बिरोबा सर्व सेवा सोसायटीच्या शतकपूर्ती आणि बहुउद्देशीय हॉलच्या शुभारंभ समारंभात ते बोलत होते. जेष्ठ नेते विष्णुपंत शिंदे समारंभाच्या अध्यक्ष स्थानी होते. शामराव वाटेगावकर,संस्थेचे मार्गदर्शक धैर्यशिल प्रकाशआबा पाटील, अध्यक्षा शोभा शिंदे,उपाध्यक्ष विजय वाटेगावकर,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी संजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वाटचालीत योगदान करणाऱ्या व्यक्तींच्या वारसांचा सन्मान करून सभासदांना भेट वस्तूचे वाटप करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले,आजच्या पिढीला सेवा सोसायट्यांचे महत्व वाटणार नाही. शेतकऱ्यां ना कर्जपुरवठा करणाऱ्या अनेक व्यवस्था आज उपलब्ध आहेत. मात्र ५०-१०० वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देण्याचे काम सेवा सोसायट्यांनी केले आहे. आपण तालुक्याच्या शिवारात पाणी आणले. सहकारी संस्था अधिक मजबूत केल्या आणि त्यातून आर्थिक परिवर्तन घडविले. यामध्ये आपली साथ मोलाची आहे. आता पुढे काय?,तर शिकलेल्या मुलांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न राहील. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्याची माहिती २४ तासात देण्याचा आदेश स्टेट बँकेस केला आहे. यातून कोणत्या उद्योगपतीने कोणत्या पक्षाला किती देणग्या दिल्या,हे बाहेर येईल. आ.पाटील यांनी आपल्या १ तास १० मिनिटां च्या भाषणात कोणत्याही पक्ष व नेत्याचा उल्लेख न करता विरोधी पक्षाचे वाभाडे काढले.
विष्णुपंत शिंदे म्हणाले,बिरोबा सेवा सोसायटीने गेल्या १०२ वर्षात गावाच्या विकासात मोलाचे योगदान केले आहे. ही संस्था आपले एक कुटुंब असून ते अधिक समृध्द करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. लोकनेते राजारामबापू पाटील,आ.जयंतराव पाटील यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून तालुक्या चा विकास केला आहे.
प्रारंभी संस्थेचे मार्गदर्शक धैर्यशिल प्रकाशआबा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला. लालासाहेब शिंदे यांनी आभार मानले. दत्तात्रय फसाले यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी सांगलीचे पै.धनपाल खोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील,संजय पाटील,अभिजित पाटील,माणिक पाटील,कार्तिक पाटील, पंढरीनाथ कोळेकर,हिंदुराव वाटेगावकर, सचिव संतोष चव्हाण यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी,संस्थेचे संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.