जाहीरनामा,वचननामा,विकासाची ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून केले होते मतदारांना आकर्षित
यामधून विकासकामांचे भलेमोठे मथळेच्या मथळे भरून संभाव्य विकासकामांची केली होती खैरात
काही ठिकाणी जुन्याच गड्यांचे नवं राज्य आलं तर काही ठिकाणी सत्तांतरे
सत्कार समारंभातून उसंत काढत कारभारी लागले ग्रामपंचायतीच्या कामकाजाला
सांगली । ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडून महिन्याचा कालावधी उलटला.काही ठिकाणी जुन्याच गड्यांचे नवं राज्य आलं तर काही ठिकाणी सत्तांतरे झाली.निवडणूक काळात विविध गटांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीरनामा,वचननामा तसेच विकासाची ब्ल्यू प्रिंट प्रसिद्ध केल्या खऱ्या पण त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करताना आता नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.नाहीतर सत्ताबदल झालेल्या ठिकाणी मागच्या पानावरुन पुढे तसेच चालू असा अनुभव येऊ नये अशी मतदारांची अपेक्षा आहे.
ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा उडालेला धुरळा निवडणूक निकाल लागून महिना उलटल्यानंतर आता कुठे शांत होतोय.ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भाग गेले तीन-चार महिने अक्षरशः ढवळून निघाला होता.निकालानंतर काही ठिकाणी जुन्याच गड्यांचे नवं राज्य आलं तर काही ठिकाणी सत्तांतरे झाली.निकालानंतर गेले महिनाभर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार-समारंभ सुरु होते.घर,वाडा,भावकी आणि गावात ठिकठिकाणी तसेच पै-पाहुण्यांकडून यथोचित सत्कार पार पडले.या सत्कार समारंभातून आता उसंत काढत आता कुठे नवं कारभारी ग्रामपंचायतीच्या कामकाजाला लागले आहेत.
निवडणूक निकालानंतर २६ जानेवारीला झालेल्या पहिल्याच ग्रामसभेच्या दिव्यातून पदाधिकारी बाहेर पडले आहेत.काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी ग्रामसभा खेळीमेळीत पार पडल्याही ! नवं कारभाऱ्यांची आता येथूनपुढे खरी कसोटी लागणार आहे ती म्हणजे निवडणूक काळात मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची.निवडणूक काळात विविध गटांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीरनामा,वचननामा तसेच विकासाची ब्ल्यू प्रिंट प्रसिद्ध केल्या होत्या.यामधून विकासकामांचे भलेमोठे मथळेच्या मथळे भरून संभाव्य विकासकामांची खैरात करण्यात आली होती.
ग्रामपंचायतीचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्यात येईल,प्रत्येक प्रभागातील लोकप्रतिनिधी,प्रशासन व नागरिक मतदार त्यांची बैठक व प्रश्नाची सोडवणूक यासाठी ‘थेट सरपंच व प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवणार,गावातील चौका-चौकात सी.सी.टी. व्ही. बसवणार,गावातील रस्ते तसेच शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते करणार,गरीब व गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याला प्राधान्य,घरकुल – गोठा योजनांपासून वंचित असणाऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देणार,ग्रामपंचायती मार्फत धान्य दळप गिरण ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर सुरु करणार,ग्रामपंचायतीमार्फत सौरऊर्जा प्रकल्प राबवणार,गावातील पथदिवे, पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायतीचा एकंदरीत कारभार सौरऊर्जेवर चालवणार,व्यापार संकुलाची उभारणी करणार यासह अनेक अन्य कामे अशी भलीमोठी विकासकामांची यादीच जाहीरनामा,वचननामा तसेच विकासाची ब्ल्यू प्रिंटमधून देण्यात आली होती.
निवडणूक काळात विविध गटांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी संभाव्य विकासकामांची यादीच मतदारांच्या दरबारात मांडली.पण,आता त्याची अंमलबजावणी करताना नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.विकासकामांबरोबरच काहींनी युवकांना नोकऱ्यांची आश्वासने दिली होती.अशा एक ना अनेक आश्वासनांची पूर्तता आता करावी लागणार आहे.जनतेतून मिळालेली पदे ही फक्त रुबाब मिरवण्यासाठी नसतात तर लोकांच्या सेवेसाठी असतात हे यापुढील काळात पदाधिकाऱ्यांना सिद्ध करावे लागणार आहे.अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाले आहेत.त्या ठिकाणी मागच्या पानावरुन पुढे तसेच चालू असा अनुभव येऊ नये अशी मतदारांची अपेक्षा आहे.