Last Updated on 26 Nov 2022 8:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पीएम-वाणी योजनेची रास्त भाव दुकानातून अंमलबजावणी
पुणे । डिजीटल इंडिया नंतर दूरसांचार विभाग, संचार मंत्रालय, भारत सरकार यांनी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे नागरिकांना वाय-फाय द्वारे इंटरनेटचा मोफत वापर करता येणार आहे. ही योजना पीएम-वाणी म्हणून ओळखली जाते.
सार्वजनिक ठिकाणी विशेषत: ग्रामिण भागातील लोकांना परवडणा-या दरात वाय-फाय तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे जाळे सर्वदूर पसरले असलेने सदर योजनेसाठी रास्त भाव दुकानदार सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणून इंटरनेट सुविधा देईल.रास्त भाव दुकानापासून १०० ते २०० मीटर परिघात येणारे सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पीएम वाणी योजनेचे उद्दिष्ट
🌑 सर्व सार्वजनिक ठिकाणी लोकांना परवडणाऱ्या दरात वाय-फाय तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
🌑 ही योजना सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील अनेक भागात व विशेषतः ग्रामीण भागात जिथे इंटरनेट सुविधा कमी अथवा नगण्य आहे तिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे.
🌑 या योजनेद्वारे देशातील नागरिकांना इंटरनेटशी जोडले जाऊ शकते. त्यामुळे वाढत्या डिजीटल अर्थव्यवस्थेत लोकांचे उत्पन्न वाढेल आणि लोकांची जीवनशैलीही सुधारेल.
🌑 या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना इंटरनेट सुविधेचा लाभ घेता येणार असून त्याच बरोबर डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
पीएम वाणी योजनेची वैशिष्ट्ये
- सार्वजनिक डेटा कार्यालय एग्रीगेटर जे शेवटच्या प्रदात्यांना एकत्रित करतील त्यांना कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही. या एग्रीगेटर ला फक्त नोंदणी करावी लागेल, ज्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज प्राप्त झाल्यापासून 7 कामकाजाच्या दिवसांत नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- या योजनेसाठी सार्वजनिक डेटा कार्यालयांना नोंदणी करणे आवश्यक नाही आणि कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
- रास्त भाव दुकानदार वाय-फाय राउटर खरेदी करून दुकानात बसवतील. रास्त भाव दुकान चालवणारा दुकानदार सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणून इंटरनेट सुविधा देईल.
- या योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या डेटाचा दर सरकारने निश्चित केलेला नाही.
पीएम वाणी योजनेचे लाभार्थी
- रास्त भाव दुकानापासून १०० ते २०० मीटरच्या परिघात येणारे सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अल्प रक्कम भरून कोणीही नागरिक इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतो.
- या योजनेद्वारे, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना इंटरनेट सेवा मिळेल जेणेकरून त्यांना अभ्यास करण्यास मदत होईल.
- इंटरनेट कनेक्शन दिल्यानंतर विद्यार्थीही ऑनलाइन क्लासेसचा लाभ घेऊ शकतील.
पीएम वाणी योजनेचे महत्व व फायदे
- पीएम वाणी योजनेच्या माध्यमातून वाय-फायमध्ये मोठी क्रांती होईल, ज्यामुळे लोकांमध्ये व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि त्याच वेळी रोजगाराच्या संधी वाढतील.
- डिजीटल इंडियाच्या दिशेने पीएम वाणी योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी वरदान ठरत आहे.
- घरोघरी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि किफायतशीर दरात डेटा उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी पीएम वाणी योजना देशभरात सुरू करण्यात आली आहे.
- पीएम वाणी योजना वापरकत्यांची नोंदणी आणि प्रमाणिकरण सेवा देणाऱ्या ॲप प्रदात्यांना देखील प्रोत्साहित करेल. सार्वजनिक वाय-फाय ब्रॉडबँडसह, ब्रॉडबैंडसाठी वापरकर्त्यांचा अनुभव आणि सेवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारेल अशी अपेक्षा आहे.
- ही सेवा विशेषतः ग्रामीण भागात उपयुक्त ठरेल जिथे भारतनेट अंतर्गत सार्वजनिक वाय- फाय हॉटस्पॉट्स देखील तयार केले जात आहेत.
- सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट्सच्या प्रसारामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी रोजगार वाढेल आणि त्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध होईल.
- सार्वजनिक डेटा कार्यालयांना बँडविड्थची विक्री केल्यामुळे दूरसंचार आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांना देखील फायदा होईल.
- यासोबतच सर्व शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचेल, अशी व्यवस्थाही करण्यात येणार आहे आणि यासाठी डिजीटल चॅनेल तयार केले जातील.
- ही योजना अद्याप समाविष्ट न झालेले आणि दुर्गम क्षेत्र डिजीटल फ्रेमवर्क अंतर्गत आणण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात मदत करेल.










































































